अकोला लोकसभा मतदारसंघातील लढत नेहमीप्रमाणे यंदाही मुख्यत: तिरंगी व पारंपरिक होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. विद्यमान खासदार भाजपचे संजय धोत्रे, भारिप-बमसंचे व नवनिर्मित महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे हिदायत पटेल हे मुख्य उमेदवार आहेत. काँग्रेसने ज्यांना खासदारकीची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता, पण शेवटी तो शब्दच ठेवला, प्रत्यक्षात उमेदवारी दिली नाही, असे भाजपतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नारायणराव गव्हाणकर यांनीही काँग्रेसकडून, तसेच अपक्ष असे स्वत:चे अर्ज दाखल केले आहेत आणि या निवडणुकीत खिजगणतीतही नसलेल्या ‘आप’ने आपला उमेदवार दिला आहे.

सध्या तरी ही लढत पारंपरिक म्हणजे भाजप, काँग्रेस व भारिप-बमसं यांच्यातच आहे. काँग्रेसने मुस्लीम चेहरा दिल्याने भारिपकडे वळणारी मते बऱ्याच प्रमाणात काँग्रेसकडे जातील. त्याचा फटका प्रकाश आंबेडकरांना बसेल, यात काही शंका नाही. प्रकाश आंबेडकरांची मुख्य मदार दलित मतांवरच आहे व ती त्यांना एकगठ्ठा मिळतातही. शिवाय, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जे सामाजिक अभिसरण राबविले आहे व ज्यामुळे दलितेतर लोकांना सत्ता मिळाली, अशी मतेही आंबेडकर खेचूू शकतात, पण निवडणूक जातीवरच होत असल्याने प्रत्यक्षात फार मोठय़ा प्रमाणात त्यांना ही मते ऐनवेळी मिळत नाहीत, हा इतिहास आहे. सध्या मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी लोकांमध्ये भावना असल्याने त्याचा लाभ संजय धोत्रे यांना मिळूू शकतो. इतकेच नव्हे, तर काँग्रेसचे मित्रपक्षही भाजपला समर्थन देत आहेत, ही धोत्रे यांची उजवी बाजू आहे. प्रत्येक निवडणुकीत जातीचा विशिष्ट प्रचार पद्धतशीररीत्या करण्यात येत असल्याने प्रत्येक उमेदवारीची मतविभागणी होणार आहे. इतर लोकांची मते कोण किती प्रमाणात स्वत:कडे वळवितो, यावर बरेच काही अवलंबून आहे. नारायणराव गव्हाणकर जर अपक्ष म्हणून लढतीत कायम राहिले तर ते भाजपची काही मते घेऊ शकतात नव्हे, कदाचित त्यासाठीच ते काम करतील, अशी शक्यता दिसून येते. तसे झाल्यास भाजपला काही प्रमाणात धक्का बसू शकतो. आपचे हिंगणकर नव्या दमाचे उमेदवार आहेत, काही मते मात्र ते निश्चितच घेतील. प्रचारात कुणीही एकमेकांवर जाहीर आरोप केलेले नाहीत. आरोपयुद्धाला सध्या तरी प्रारंभ झालेला नाही.

काँग्रेसने व्यवस्था बिघडवली -संजय धोत्रे
काँग्रेसने सर्व व्यवस्था बिघडवून टाकली आहे. विरोधकांच्या मतदारसंघात विकासकामे होऊ दिली नाहीत. मोदी पंतप्रधान झाल्यास विकास करू शकतात. देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे. भाजपवर इतर कोणाच्याही उमेदवारीचा परिणाम होणार नाही, असे धोत्रे म्हणाले.

लोकांचा चांगला प्रतिसाद -हिदायत पटेल
जिल्ह्य़ात विकासकामे झालीच नाहीत. यवतमाळ ते खंडवा मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात खासदारांना यश मिळाले नाही. विमानतळाचा प्रश्नही सुटलेला नाही. आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. शिवाय, पक्षातील सर्व घटक एकदिलाने व पूर्ण शक्तीने आपल्यासोबत आहेत, असे काँग्रेसचे हिदायत पटेल म्हणाले.