यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा वाढणार असून  ४२ पेक्षा जास्त आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यात नागपूरसह सर्व ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते एकदिलाने प्रचार करीत असून नागपुरात एक लाखाहून अधिक मताधिक्य मुत्तेमवारांना राहील, असाही दावा त्यांनी केला.
 २००९ लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला विदर्भात आठपेक्षा कमी जागा मिळतील, असे अनुमान सव्‍‌र्हेक्षणातून व्यक्त झाले होते. प्रत्यक्षात राज्यात २६ पैकी १७ जागा तेव्हा काँग्रेसला मिळाल्या. यंदाही सव्‍‌र्हेक्षणातील अनुमान काहीही व्यक्त केले जात असले तरी जनता मतदान करेल व काँग्रेसला वा पर्यायाने आघाडीला जागा वाढलेल्या दिसतील. विदर्भात गेल्या वेळेसपेक्षा पाच जागा जास्त मिळतील.
 महागाई वाढली हे खरे आहे. महागाई उत्पादनावर आधारित असते. तरीही महागाईवर नियंत्रण आणण्याचा काँग्रेस आघाडी सरकारने प्रयत्न केला आहे. भाजी व धान्याच्या महागाईवर नियंत्रण आणणे आहे. राज्यातील अकरा जिल्ह्य़ांमध्ये वीस सभा झाल्या आहेत. काँग्रेसला अत्यंत चांगली स्थिती आहे, असे ते म्हणाले.