केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने इतके घोटाळे केलेत की त्यांना आता जनता माफ करु शकत नाही, पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यापेक्षा जास्त कालावधी यांना पंतप्रधान पदासाठी मिळाला, परंतु तो त्यांनी घोटाळ्यांसाठी वापरला. या घोटाळेबाज काँग्रेस सरकारची आता मतदारांनी सत्तेतून हाकलावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी सोमवारी शेवगाव येथील सभेत बोलताना केले.
भाजपचे नगरमधील उमेदवार दिलीप गांधी यांची प्रचार सभा शेवगावमधील खंडोबा मंदिर मैदानात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गातही समाधान वाटेल, असा चमत्कार जनतेने करुन दाखवावा, असेही आवाहन त्यांनी केले.
मनमोहनसिंग हे देशातील सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरले आहेत अशी टीका अडवाणींनी केली. युपीएचे सरकार असताना आम्ही उत्तराखंड, झारखंड, पुर्वाचल ही तीन राज्ये आरामात निर्माण केली, कोणताही असंतोष निर्माण झाला नाही. परंतु काँग्रेसच्या काळात तेलंगण राज्याच्या निर्मितीने अराजक निर्माण केले, असेही अडवाणी म्हणाले. मोदींना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.