कोण चुकीच्या मार्गाने गेले हे देशच ठरवेल, त्याची उठाठेव दुसऱ्यांनी करायची गरज नाही, अशा शब्दात भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी त्यांचे पुत्र वरुण गांधी यांच्याबाबत प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली.  
प्रियांका गांधी यांनी अमेठी येथे सांगितले की, शेजारच्या सुलतानपूर मतदारसंघात भाजपला मते देऊ नका, तेथे माझा चुलत भाऊ वरुण गांधी उभा आहे तो माझ्या कुटुंबातला आहे पण तो भरकटलेल्या मार्गाने चालला आहे. जर कुटुंबातील तरुण मुलगा चुकीचा मार्ग निवडत असेल तर घरातील थोरामोठय़ांनी त्याला योग्य मार्ग दाखवला पाहिजे तुम्ही सर्वानी माझ्या भावाला खरा मार्ग दाखवा असे आवाहन मी तुम्हाला करीत आहे.
यावर वरुणच्या आई मनेका गांधी यांनी सांगितले की, जर वरुण देशाची सेवा करताना भरकटला असेल तर देश काय ते ठरवील तुम्ही त्याची काळजी करण्याची गरज नाही. अमेठी येथे राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होत्या.