उत्तरप्रदेशातील आझमगढ हे ठिकाण दहशतवाद्यांचा अड्डा झाल्याचे विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते अमित शहा यांच्यावर बहुजन समाज पक्षाच्या(बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी सडकून टीका केली.
मायावती म्हणाल्या, नेमकेपणाने पहायचे झाल्यास संपूर्ण गुजरात राज्य दहशतवाद्यांचा तळ झाल्याचे मी म्हणेन. आझमगड येथील सगळ्यात मोठा दहशतवादी म्हणजे येथील भाजपचे उमेदवार रमाकांत यादव हे आहेत. मी स्वत: त्यांची बसपमधून हकालपट्टी केली होती, संपूर्ण आझमगडमध्ये यादव यांची दहशत आहे.” असेही त्या म्हणाल्या. तसेच उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल भागामध्ये येण्यावर शहा यांना मनाई करावी, अशी मागणीही मायावती यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शहा यांच्याबरोबर नेहमी वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांच्यावरही उत्तर प्रदेशात येण्याची बंदी घालण्यात यावी असेही त्या म्हणाल्या आहेत.