दहा वर्षांपूर्वी ‘इंडिया शायनिंग’, ‘फिल गुड’ असे वारंवार ऐकण्यात आले होते. प्रसारमाध्यमे आणि जनमत चाचण्यांनी अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान होणार असे चित्र रंगविले. प्रत्यक्षात काय झाले ते सर्वाना माहीत आहे. राजकारण्यांपेक्षा जनता अधिक हुशार असून योग्य वेळी ती योग्य निर्णय घेते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या कथित लाटेची तिच गत होणार असल्याचा टोला लगाविला. नाशिक लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ आणि दिंडोरीतील डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पवार यांनी शनिवारी तीन सभा घेतल्या.
उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिक येथे जाहीर सभेत पवार यांच्यावर ‘भ्रष्टाचाऱ्यांच्या संघाचे कप्तान’ अशा शब्दात टिका केली होती. त्यास उत्तर देताना, आपणास आजपर्यंत १४ वेळा जनतेने निवडून दिले आहे. उध्दव यांनी किमान एकदा तरी निवडून यावे, असे आव्हान पवार यांनी दिले. युती म्हणजे राजा-प्रधानजीचा खेळ आहे. शेतमालास योग्य भाव मिळाला पाहिजे हे काँग्रेस आघाडीचे धोरण आहे. परंतु, या धोरणाला सेना-भाजपचा विरोध असल्याचे पवार यांनी सांगितले.