काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचे अन्य राजकीय पक्षांशी लागेबांधे असून हे नेते गांधी कुटुंबीयांना विशेषत: उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दूर सारण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे.
पक्षातीलच काही ज्येष्ठ नेते गांधी कुटुंबीयांना विशेषत: राहुल गांधी यांना दूर लोटण्यासाठी सरसावले आहेत. जे नेतृत्वावर टीका करीत आहेत ते स्वपक्षीयच असून त्यांचे अन्य राजकीय पक्षांशी लागेबांधे आहेत, असे वर्मा म्हणाले.
मात्र कोणत्याही नेत्याचे नाव घेण्यास त्यांनी नकार दिला. हे नेते कोण आहेत त्याची जाणीव प्रत्येकाला आहे. विधानसभेच्या २०१२ च्या निवडणुकीत ज्यांनी उमेदवारी विकली, राज्यात पक्षाची स्थिती बिकट होत असताना मोठी माया गोळा केली आणि लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले, त्यापैकीच हे नेते असल्याचे वर्मा म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे नेते राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव करीत होते तेच नेते पराभवानंतर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत अशी टीका केली.