लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेत देशासह महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीची ‘वाट’ लागली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेसअंतर्गत धुसफूस सुरू झाली असतानाच सोलापूर लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेले पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यात तूर्त तरी न येता नवी दिल्लीतच थांबणे पसंत केले आहे. स्वत:ला पक्षबांधणीत झोकून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या धोबीपछाडनंतर काँग्रेस पक्ष संघटनेच्या बांधणीची मोहीम लवकरच सुरू होणार असून यात आपण सहभागी होणार असल्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा विचार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. पक्षबांधणीच्या कामात पक्षश्रेष्ठींनी विशेष जबाबदारी सोपविल्यास ती पार पाडण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसच्या विरोधात आलेली मोदी लाट केंद्रीय गृहमंत्री असलेले शिंदे रोखू शकले नाहीत. अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून त्यांना धक्कादायक पराभव सहन करावा लागला. या पाश्र्वभूमीवर संवेदनशील वृत्तीचे शिंदे हे पराभव अधिकच मनाला लावून घेतील व राजकारणातून निवृत्ती पत्करतील, अशी अटकळ राजकीय जाणकार व्यक्त करीत होते. त्यास छेद देत शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती न स्वीकारता उलट, राष्ट्रीय स्तरावर पक्षबांधणीच्या कामात गुंतवून घेण्याचे संकेत दिले.