सीमांध्र व तेलंगणात भारतीय जनता पक्ष(भाजप) आणि तेलगु देसम पक्ष(टीडीपी) यांची युती घोषित करण्यात आली होती मात्र, गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या अंतर्गत तणावांमुळे ही युती तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू नाराज असल्याची चर्चा आहे. आज(शुक्रवार) सकाळी चंद्राबाबू नायडू यांची भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी भेट घेऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीमांध्र भागामधील भाजप लढवित असलेल्या १४ मतदारसंघांपैकी ८ जागांवरील उमेदवार बदलण्यात यावेत अशी मागणी नायडू यांनी केली आहे. भाजपने या जागांवर मुद्दाम दुर्बळ उमेदवार उभे केले असल्याचा आरोप तेलगु देसम पक्षाने केला आहे. तसेच उर्वरित ६ जागांवर तेलगु देसम पक्षाच्या उमेदवारांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे ही युती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.