आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या लोकशाही राज्यपद्धतीने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा हा हक्क बजाविण्यासाठी मतदान करावे. आपल्या घरी गडी ठेवायचा असेल तरी आपण त्याची चौकशी करतो, माहिती घेतो आणि त्यानंतरच त्याची निवड करतो. मग लोकप्रतिनिधी म्हणून पुढील पाच वर्षांसाठी ज्याची निवड करायची आहे, ती व्यक्ती कशी आहे ते पाहून आणि सारासार विचार करून प्रत्येकाने मतदान करावे. जो कोणी उमेदवार निवडणुकीला उभा आहे, त्याच्याबद्दलची माहिती, प्रसारमाध्यमातून आलेल्या त्याच्या संदर्भात आलेल्या बातम्या, प्रचारसभा या सगळ्यातून सर्वसामान्य माणूस विचार करतो आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये त्याला जो उमेदवार योग्य वाटतो, त्याला तो मतदान करतो. आपल्याला पाहिजे आहे अशी व्यक्ती निवडून देणे हे मतदारांच्याच हातात असते. मतदानाच्या माध्यमातून ही संधी सर्वसामान्य नागरिकांना मिळत असते. ही संधी वाया न घालविता प्रत्येकाने त्याचा फायदा करून घ्यावा. मतदारांचे मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि अन्य असे कोणतेही वर्गीकरण न करता या देशाचा नागरिक आणि जागरूक मतदार म्हणून प्रत्येकाने मतदान करावेच.