संपूर्ण जग बदलू म्हटले तर ते सहजशक्य नाही हे खरे आहे. पण, बदलाची सुरुवात कुठे तरी होईलच नं? त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. एक मत दिले नाही म्हणून काय फरक पडणार आहे, असे आपले म्हणणे असते. पण, प्रत्यक्षात एकेक थेंब मिळूनच समुद्र होत असतो. भले तो होण्यासाठी काही वेळ लागत असेल. तीच गोष्ट आपल्या मतांची आहे. आपल्या प्रत्येकाचे एकेक मत मिळूनच मताचा सागर होईल आणि देशाचे भवितव्य बदलेल. पण, त्यासाठी मुळात मतदान करणे गरजेचे आहे. नव्हे ते फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर आपल्या परिस्थितीत आणि देशात बदल व्हावा असे वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी जे प्रयत्न करता ते महत्त्वाचे ठरतात. मतदान हा बदलाचा चांगला आणि लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेला मार्ग आहे. त्याचा पुरेपूर उपयोग आपण केला पाहिजे. बदल घडवून आणायचा असेल तर आपण सर्वानी मिळून मतदान केलेच पाहिजे.