लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यासाठी रिपाइंच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी चक्क राज्य निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठले. ही निवडणूक लोकसभेची आहे, ग्रामपंचायतीची वा नगरपालिकेची नाही, असे तेथील अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्यात आली. लोकसभा निवडणुका जाहीर होताच विविध राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडका सुरू केला आहे, त्याचबरोबर एकमेकांविरुद्ध आचारसंहिता भंगाच्या तक्रारीही केल्या जाऊ लागल्या आहेत. राहुल गांधी गुरुवारी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईभर त्याला रिपाइंने आक्षेप घेतला आहे. निवडणुका जाहीर झाल्याने अशा प्रकारचे फलक लावणे हा निवडणूक आचारसिहतेचा भंग असून त्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी अशी पक्षाने मागणी केली. रिपाइंचे उत्साही कार्यकर्ते तेवढय़ावरच थांबले नाहीत, तर काँग्रेसने आचारसंहितेचा भंग केला आहे, राहुल गांधी व इतर काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन घेऊन त्यांनी चक्क राज्य निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठले. पण लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील जो काही पत्रव्यवहार असतो तो राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे करायचा असतो, नितीन गद्रे हे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत, असे तेथे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. मग त्यांचा मोर्चा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे वळला.