शेतात मधमाश्यांचे मोहोळ असेल तर त्याच्या माश्या आजूबाजूच्या सुमारे २ किलोमीटर परिघात फिरतात. त्यांच्या अन्नशोधनातून आपोआप परागीकरण होते व उत्पादन वाढते. मधमाश्यांच्या संगोपनातून किती उत्पादन घेता येते याचा एक आदर्श वस्तुपाठ लातूर जिल्हय़ातील चाकूर तालुक्यातील िहपळनेर गावच्या दिनकर पाटील या पदवीधर तरुणाने घालून दिला आहे.

सर्वसाधारणपणे मधाच्या मोहोळाचा संबंध हा आपल्याला मिळणाऱ्या मधाशी लावला जातो, मात्र हा मध निर्माण करताना त्याचा संबंध शेतीच्या उत्पादनाशी आहे हे आपल्याला माहिती नसते. मिळणारा मध, मेण याचाच आपण विचार करत असतो. एक बी पेरल्यानंतर त्यापासून शेकडो बिया तयार होतात. ही प्रक्रिया निसर्गात पार पडत असताना अनेक घटकांचे यात साहाय्य मिळत असते. पीक फुलोऱ्यात आल्यानंतर स्त्रीकेसर व पुंकेसर याचा संयोग घडून येण्यासाठी त्रयस्थाची गरज असते. वाऱ्याच्या रूपाने त्रयस्थाची भूमिका पार पडत परागीकरण घडते. त्याचबरोबर मधमाश्यांची भूमिका यात अतिशय मोठी असते. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मध घेण्यासाठी जेव्हा माश्या जातात तेव्हा त्यांच्या पायांना परागकण चिकटून जातात व त्यातून पुंकेसर व स्त्रीकेसरचा संयोग घडतो. निसर्गात चालणारी ही प्रक्रिया वर्षांनुवष्रे घडत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचे महत्त्व फारसे माहिती नसते.

गेल्या काही वर्षांत शेतीतून अधिक उत्पादन घेत असताना पिकावर पडणारे विविध रोग नष्ट करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी केली जाते. ही फवारणी एक वेळ करून चालत नाही तर एका पिकासाठी किमान ३ ते ४ फवारण्या केल्या जातात. कीटक मरावेत यासाठी अतिशय विषारी औषधे वापरली जातात. गेल्या काही वर्षांत या औषधांची तीव्रता इतकी वाढली आहे की पिकावर फवारणी सुरू असताना झाडावर बसलेल्या मधमाश्या थेट वरून गळून पडतात व मरण पावतात. तूर, कापूस, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, कांदा, लसूण, डाळिंब, आंबा, पपई, केळी, अशा सर्वावर फवारणी केली जाते. गेल्या दहा वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या कमी होत असून नवीन वृक्षलागवड होत नाही. मधमाश्यांना बसायला पुरेशी जागा नाही. पिकावर औषध मारलेले असल्यामुळे मध चाखण्यास त्या गेल्या तर औषधामुळे त्या मरण पावतात. पिण्याच्या पाण्याचेही त्यांना दुíभक्ष आहे. त्यामुळे मधमाश्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात घटली आहे.

दरवर्षी ही घट होत असून मागच्या दहा वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न केले तर किमान १० वष्रे स्थिती पूर्वपदावर येण्यास लागतील. रासायनिक फवारण्यांचे दुष्परिणाम अतिशय घातक आहेत. अनेक शेतकरी सेंद्रीय औषधांचा वापर करतात, मात्र दुर्दैवाने अद्याप संपूर्णपणे किडीचा प्रादुर्भाव बंद करता येईल याची खात्री देणारे सेंद्रीय औषध पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे रासायनिक औषधांचा वापर होतो आहे. परागीकरणाची प्रक्रिया खंडित होत असल्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत मोठय़ा प्रमाणावर घट होते आहे. ही प्रक्रिया पूर्ववत झाली तर उत्पादकतेत किमान २० ते २५ टक्के वाढ होईल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

अमेरिका व इस्रायलसारख्या देशांत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालन करण्यासाठी तेथील सरकार प्रोत्साहन देत आहे. प्रगत देशांत याची जाणीव लवकर निर्माण होते. तेथील शासन यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देते. आपल्याकडे सर्वानाच उशिरा जाग येत असल्यामुळे उपाययोजना संथ गतीने होतात. भारतीय संस्कृतीत जैवविविधतेला अतिशय महत्त्व दिले जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या संतांनीही वृक्षाचे महत्त्व व जीवजंतूचे महत्त्व आपल्या अभंगांतून सामान्य जनतेला सांगितले होते. दुर्दैवाने आपापल्या सोयीचे अर्थ घेण्याची सवय आपल्याला लागल्यामुळे संतांनी ज्या मूलभूत बाबी सांगितल्या आहेत त्याकडे आपले लक्ष जात नाही.

आपल्याकडे प्राचीन काळात वृक्षविविधता होती. वर्षभरात जी २७ नक्षत्रे सांगितली जातात त्या प्रत्येक नक्षत्रात कोणते ना कोणते फूल निसर्गात राहत असे. त्यामुळे मधुमक्षिकांना वर्षभर खाण्यासाठी अन्न मिळत असे व मधही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत असे. उन्हाळय़ात करंज, आंबट चिंच, कडुिनब, वेडीबाभूळ, पळस, गुलमोहोर, अंजन याची फुले उपलब्ध असतात. अशी प्रत्येक नक्षत्रात राहत असत. आपल्याला जे उपयोगात आहे असे वाटते ते ठेवायचे व अन्य निरुपयोगी समजून काढून टाकायचे ही प्रवृत्ती गेल्या काही वर्षांत वाढू लागली. मोठय़ा वृक्षांपेक्षा बोन्साय वृक्षाकडे कल वाढला. त्यातूनच ८ ते १० फूट उंचीचेच फळ देणारे वृक्ष वाढीस लागले. पूर्वीचे भले मोठे वृक्ष नष्ट होत चालल्यामुळेच मधमाश्यांसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध होत नाही.

भारतात सुमारे ५ प्रकारच्या मधमाश्या आढळतात. ‘अ‍ॅपीस ट्रायगोना’ ज्याला आपण चिरटय़ा मोहोळ किंवा पोळय़ांचे मोहोळ म्हणतो. ज्या माश्या चावत नाहीत व सहसा स्थलांतर करीत नाहीत. या माश्या परागीकरणासाठी अतिशय उपयुक्त आहेत व त्या अंधारात राहतात. दुसरी माशी ‘अ‍ॅपीस फ्लोरिया’ ज्याची माशी काटेरी असते. तिसरा प्रकार ‘अ‍ॅपीस सेराना’ ही सातेरी मधमाशी आहे. ती सात पौळ बांधते व अंधारात राहते. चौथा प्रकार ‘अ‍ॅपीस मेलीफेरा’ ही इटालियन जात आहे. तिही अंधारात राहते व आपल्याकडे या माश्यांचे प्रमाण अतिशय मोठय़ा प्रमाणावर आहे. पाचवी प्रजाती ‘अ‍ॅपीस डॉरसाटा’ ही असून त्याला आपल्याकडे ‘आग्या मोहोळ’ असे संबोधले जाते. ही माशी उघडय़ावर असते. मधमाश्यांच्या एका मोहोळामध्ये किमान २५ हजार माश्या असतात व एक मोठे मोहोळे एका गावाला जगवू शकते.

शेतात मधमाश्यांचे मोहोळ असेल तर त्याच्या माश्या आजूबाजूच्या सुमारे २ किलोमीटर परिघात फिरतात. त्यांच्या अन्नशोधनातून आपोआप परागीकरण होती व उत्पादन वाढते. मधमाश्याच्या संगोपनातून किती उत्पादन घेता येते याचा एका आदर्श वस्तुपाठ लातूर जिल्हय़ातील चाकूर तालुक्यातील िहपळनेर गावच्या दिनकर पाटील या पदवीधर तरुणाने घालून दिला आहे. गेल्या दहा वर्षांत मध गोळा करण्याची या तरुणाची क्षमता तब्बल २५ टनांवर पोहोचली आहे. सुमारे ७०० मधपेटय़ा त्याच्याकडे असून १ कोटीपेक्षा अधिक मधमाश्यांची संख्या आहे. देशातील मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर अशा प्रांतांत ते मधमाश्यांच्या पेटय़ा घेऊन फिरतात. पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ ज्या पद्धतीने मेंढय़ा घेऊन फिरत असतात त्याच पद्धतीने दिनकर पाटील हे मधमाश्यांच्या पेटय़ा घेऊन फिरतात. वर्षांतील खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीन हंगामांत कोणत्या प्रांतातील कोणत्या जिल्हय़ातील कोणत्या गावात जायचे हे त्यांचे वेळापत्रक ठरलेले असते. ज्याप्रमाणे मराठवाडय़ातील शेतकरी मेंढपाळांना ज्या आस्थेवाईकपणाची वागणूक देतात तशीच वागणूक दिनकर पाटील यांच्या मधमाश्यांच्या पेटय़ांना मिळते. त्या पेटय़ा शेतात ठेवल्यामुळे उत्पादन वाढते याचा अनुभव शेतकरी घेत असल्यामुळे मधमाश्यांच्या पेटय़ा ठेवण्यासाठी त्यांना पसेही दिले जातात.

गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी अतिशय कष्ट घेत हा उद्योग विकसित केला आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाची वार्षकि गरज पुरवणारा महाराष्ट्रातील हा एकमेव तरुण आहे. संपूर्ण जगाला मध पुरवता येईल इतकी आपल्या देशाची क्षमता आहे, मात्र या बाबतीत जी जागरूकता दाखवली गेली पाहिजे त्याचा अभाव वाढत असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. या वर्षी मे महिन्यात चाकूर येथे गौरी नॅचरल फुड्स या नावाने त्यांनी रियल हनी हा मधाचा नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. आपल्या शेतीचा विकास व्हावा, शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांनी जागरूकता दाखवली तर मधाचे उत्पादन मिळेल, शिवाय उत्पादनातही चांगली वाढ होईल.

मधुमक्षिकापालनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण उपलब्ध

पुणे येथील केंद्र सरकारच्या मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्र, जे खादी व ग्रामोद्योग संस्थेअंतर्गत कार्यरत आहे, तेथील पर्यवेक्षक आर. जी. बोकडे यांनी शेतकऱ्यांनी निसर्गाला समजून घ्यावे असे सांगितले. प्रत्येक पिकासाठी शत्रू व मित्र कीड असते. रासायनिक फवारणीमुळे हे दोन्ही किडे मरतात, त्यामुळे पिकांना मदत करणाऱ्या किडीही मरण पावल्यामुळे पिकाची उत्पादकता घटते. मधमाश्यांमुळे फुलोऱ्यात आलेल्या पिकाचे परागीकरण वाढते, शिवाय कीडही कमी होते. खाद्य ग्रामोद्योगच्या पुणे येथील केंद्रात पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केवळ ५०० रुपये शुल्क आकारले जाते. या प्रशिक्षणातून शास्त्रोक्त पद्धतीने मधुमक्षिकापालन हा व्यवसायही सुरू करता येतो, ज्यातून शेतकऱ्याला अधिकचे उत्पन्न मिळते, शिवाय गाव व परिसरातील उत्पादकता वाढवण्यास मदतही होते, असे ते म्हणाले.

pradeepnanandkar@gmail.com