जमिनीतील उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतून पिकांनी घेतलेली अन्नद्रव्ये परत करणे गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीतून निघालेला सेंद्रिय भाग शक्य तितका जमिनीत परत करणे हे उत्तम शेतीचे महत्त्वाचे अंग आहे. सेंद्रिय पदार्थामध्ये पालापाचोळा, उसाचे पाचट, इत्यादी न कुजवता शेतात वापरणे शक्य आहे. असे न कुजलेले पदार्थ शेतात वापरल्यामुळे नत्राची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून नत्रासह स्फुरदयुक्त खतांची जास्त मात्रा पिकांना द्यावी लागते. अलीकडे पाण्याचा आणि रासायनिक खतांचा अतिवापर वाढला आहे. त्यातच सेंद्रिय खतांचा विसर पडत चालल्यामुळे जमिनी पानथळ आणि क्षारयुक्त बनल्या असून त्यामुळे जमिनीच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पूर्वी सेंद्रिय पदार्थाचा शेतात सर्रास वापर व्हायचा. साहजिकच त्यामुळे जमिनीचा पोत राखला जायचा. मात्र अन्नधान्याची जसजशी गरज वाढू लागली, तसतशी पाणी आणि रासायनिक खतांची मात्रा वाढू लागली. कूपनलिका, कालवे, विहिरी यांची संख्या वाढू लागली आणि सिंचनाचे प्रमाण वाढले. अधिक पीक उत्पादन घेण्याच्या नावाखाली एक पीक पद्धत अस्तित्वात आली. एकूणच जमिनीची कार्यक्षमता धोक्यात आली असून जमिनीची उत्पादनक्षमता कमी होत चालली आहे. नदीकाठच्या, कालव्याने पाणी पुरवल्या जात असलेल्या जमिनी क्षारयुक्त झाल्या आहेत. येथील जमिनीत पिकेच येत नाहीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे. अशा जमिनीची सुपिकता वाढवायची असेल तर जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टींवर कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्रमाणे पाण्याची उपलब्धता व रासायनिक खतांचा संतुलित वापर जेवढा महत्त्वाचा आहे, तितकाच नव्हे त्याहून अधिक सेंद्रिय पदार्थाचा व सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे. बाजारात मिळणारी सेंद्रिय खते, भूसंवर्धके, तसेच सूक्ष्म अन्न द्रव्य खते सेंद्रिय खतांना पर्याय ठरू शकत नाहीत. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर ही सध्याला काळाची गरज आहे. सेंद्रिय पदार्थाचे विघटन हे काही महत्त्वाच्या बाबींवर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थाचा अथवा खतांचा प्रकार, जिवाणुंची संख्या, पाणी व तापमान यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थाचे जैविकरीत्या विघटन होत असते त्याचप्रमाणे रासायनिकरीत्याही त्यांचे विघटन होते. जसे-जसे तापमान वाढत जाते तसा सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाचा वेग वाढतो. बऱ्याच वेळा सेंद्रिय खते नांगरणीनंतर वापरली जातात. त्यामुळे ती जमिनीच्या पृष्ठभागावर तशीच पडून राहिल्याने त्यांचे लवकर विघटन होते व पिकासाठी हवा तेवढा उपयोग होत नाही. ही परिस्थिती सेंद्रिय खते माती आड न ढकलल्याने उद्भवते. आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळी एक टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्याची गरज आहे. सेंद्रिय खतांमध्ये वनस्पती व प्राणी यांच्या अवषेशापासून तयार झालेल्या सर्व प्रकारच्या खतांचा समावेश होतो. सेंद्रिय खतांमध्ये भरखते व जोडखते, असे योग्य भाग करतात, भरखतांमध्ये रासायनिक अन्न द्रव्यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ती मोठय़ा प्रमाणात वापरावी लागतात. ही खते पिकास सावकाशपणे, परंतु दीर्घ कालापर्यंत उपयोगी ठरतात. यामुळे जमिनीची जडणघडण, पोत, जलधारणा, शक्ती व विद्युत वाहकता वाढते. त्या शेणखत, लेंडीखताचा समावेश होतो. तर जोडखतांमध्ये पोषक अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही खते कमी वापरावी लागतात. यामध्ये सर्व खतांची पेंडी, खतांची भुकटी, हाडांचा चुरा, मासळीखत यांचा समावेश होतो. ऊस जास्त पसा मिळवून देणारे पीक आहे. मात्र या पिकाला पाण्याची अधिक गरज आहे. पाण्याची उपलब्धता जशी झाली तशी ओलिताखालील क्षेत्रात वाढ झाली. उसाचे क्षेत्र वाढले. सेंद्रिय खतांच्या किमती वाढल्याने खतांच्या उपलब्धतेवर मोठा प्रश्न उभा राहिला. अशा परिस्थितीत शेतातील वाया जाणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा सेंद्रिय खतासाठी वापर वाढवणे गरजेचे आहे. जमिनीतील उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतून पिकांनी घेतलेली अन्नद्रव्ये परत करणे गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीतून निघालेला सेंद्रिय भाग शक्य तितका जमिनीत परत करणे हे उत्तम शेतीचे महत्त्वाचे अंग आहे. सेंद्रिय पदार्थामध्ये पालापाचोळा, उसाचे पाचट, इत्यादी न कुजवता शेतात वापरणे शक्य आहे. असे न कुजलेले पदार्थ शेतात वापरल्यामुळे नत्राची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून नत्रासह स्फुरदयुक्त खतांची जास्त मात्रा पिकांना द्यावी लागते. म्हणून सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी एक टन वाढलेल्या सेंद्रिय पदार्थासाठी १० किलो युरिया, १० किलो सिंगल सुपरफॉस्फेट व १ किलो कुजविणारे जिवाणू वापरावेत. सेंद्रिय पदार्थ मातीआड केल्यास कुजविण्याची क्रिया लवकर होते. न कुजलेले पदार्थ जमिनीच्या पृष्ठभागावर जरी राहिले तरी त्यापासून नुकसान न होता फायदा होतो. अशा पृष्ठभागावर राहिलेल्या सेंद्रिय पदार्थाचा आच्छादन म्हणून उपयोग होतो. त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो त्यामुळे पिकांना उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसला तरी उत्पादनात घट येत नाही. तसेच सेंद्रिय पदार्थ कुजत असताना त्यातील कर्बप्रणीत वायू बाहेर पडत असतो. वनस्पतीला या वायूचा उपयोग प्रकाश संस्लेषण क्रियेत होतो. त्यामुळे पानांमध्ये पिष्टमय पदार्थ तयार होण्याचा वेग वाढतो आणि पर्यायाने पिकांची जोमदार वाढ होते. उसाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास शेतातील कर्बप्रणीत वायूचे प्रमाण वाढविले पाहिजे. त्यासाठी न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचा वापर महत्त्वाचा ठरतो. उसाचे उत्पादन घटण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यापकी जमिनीचे बिघडलेले आरोग्य व खोडवा पिकाचे कमी उत्पादन ही प्रमुख कारणे आहेत. उसाच्या उत्पादनाबरोबर मोठय़ा उसाचे अवशेष मिळतात. सर्वसाधारणपणे हेक्टरी ८ ते १० टन पाचट व ४ ते ५ टन खोडकी मिळते, ऊस तोडणीनंतर शेतातील सर्व पाचट शेतकरी जाळून टाकतात. उसाच्या पाचटात ०.५ नत्र ०.२ टक्के स्फुरद, ०.७ ते १ टक्कापर्यंत पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. तर उसाच्या बोडकीत ०.४ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद व ०.२ टक्के पालाश असते. असे पाचट व खोडकी जाळल्यास सेंद्रिय कर्बाचा पूर्णता नाश होतो. पाचटातील नत्र व स्फुरदचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक भाग जळून जातो. केवळ पालाश शिल्लक राहते. एक हेक्टर क्षेत्रातून अनुक्रमे ५० किलो नत्र, २० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश तर ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब तर खोडकीतून ५० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश जमिनीत घातले जावे. (लेखक कृषी अभ्यासकआहेत.) ainapurem1674@gmail.com