तासगाव शहरापासून पूर्वेला अवघ्या चार किलोमीटर अंतरावर पुणदी गाव आहे. संगम बनसोडे याची वडिलोपार्जति अडीच एकर जमीन आहे. या जमिनीत कुसळंही येत नाहीत, अशी परिस्थिती असताना त्याने रेशीम उद्योगातून एका एकरात वर्षांला तीन ते साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळवले. एक एकर तुती आणि साधा पत्र्याचा शेड यावर सुरू केलेल्या या व्यवसायाने आज त्याला समृद्धी दिली आहे. रेशीम उद्योग हा शेतीला एक चांगला जोडधंदा म्हणून पुढे आला आहे. कमी भांडवलात हमखास फायदा देणारा हा उद्योग आपल्या महाराष्ट्रात चांगलाच पसरू लागला आहे. वास्तविक आपल्याकडे पावसाच्या पाण्यावर शेती करण्याकडे अधिक कल आहे. याला कारण म्हणजे पाऊसमान कमी, त्याचा लहरीपणा. साहजिकच पाण्याची मोठय़ा प्रमाणात कमतरता. भांडवलाचा अभाव. पण त्यातूनही काही जिद्दी शेतकरी नव्या वाटा चोखाळत नवनवे प्रयोग करताना आणि त्यात यशस्वी होताना दिसतात. रेशीम उद्योगाने अशा कष्टाळू, जिद्दी शेतकऱ्यांना चांगलाच मदतीचा हात दिला आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या पुणदी गावच्या संगम बनसोडे या अल्पशिक्षित तरुण शेतकऱ्याच्या घरात रेशीम उद्योगाने समृद्धी आणली आहे. तासगाव शहरापासून पूर्वेला अवघ्या चार किलोमीटर अंतरावर पुणदी गाव आहे. संगम बनसोडे याची वडिलोपार्जति अडीच एकर जमीन आहे. या जमिनीत कुसळंही येत नाहीत, अशी परिस्थिती असताना त्याने आपल्या हिकमतीच्या जोरावर रेशीम उद्योगातून एका एकरात वर्षांला तीन ते साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळवले. एक एकर तुती आणि साधा पत्र्याचा शेड यावर सुरू केलेल्या या व्यवसायाने आज त्याला समृद्धी दिली आहे. त्याच्या जोरावरच तो दोन्ही मुलींना अभियांत्रिकीसारखे महागडे शिक्षण देत आहे. नोकरीची आस धरलेल्या तरुणांना त्याने आपल्या कृतीतून एक चांगला संदेश दिला आहे. रेशीम किडय़ापासून केवळ २८ दिवसांत रेशीम कोष तयार होण्याच्या कालावधीत दिवसातून दोन तास काम करायचे. महिन्याकाठी ३५ ते ४० हजार रुपये हा उद्योग मिळवून देतो. अत्यंत कमी भांडवलातला हा उद्योग सेंद्रिय शेती उद्योगही आहे. या शेतीला औषध किंवा रासायनिक खतांची आवश्यकता नाही. त्यामुळे पर्यावरणासही काही धोका नाही. कच्चा माल तुती व रेशमी किडय़ांचे अंडे उपलब्ध होण्यास फारशी अडचण नाही. सांगली, कोल्हापूर, बीड, सोलापूर, सातारा या भागातील शेतकऱ्यांना कर्नाटकात व्यापार केंद्रे उपलब्ध आहेत. चांगला भाव मिळत असल्याने आर्थिक फटका बसण्याचा धोका नाही. रेशीम उद्योगामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात भरभराट झाली आहे. रेशीम शेती, उद्योग करणारे शेतकरी आणि यातील जाणकार यांच्याशी गप्पा मारल्यावर हा उद्योग खरोखरच समृद्धी देणारा असल्याचे लक्षात येते. या उद्योगापासून आपणास मोठय़ा प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते. भारतात रेशीम उद्योग हा दक्षिण भारतात मोठय़ा प्रमाणात राबविला जात आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा पारंपरिक रेशीम उद्योग करणारी राज्ये म्हणून उल्लेख केला जातो. आपल्या महाराष्ट्रातदेखील रेशीम उद्योग मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. रेशीम उद्योग घेणाऱ्या अपारंपरिक राज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आहे. राज्यामध्ये एकूण २०-२२ जिल्ह्यांमध्ये रेशीम उद्योग शासनामार्फत राबविला जात आहे. रेशीम उद्योगामध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता असून ग्रामीण भागाचा कायापालट करणारा आहे. एक हेक्टर बागायत तुतीपासून वर्षांत ६६६ जणांना रोजगारनिर्मिती होते, अशी माहिती शेतकरी देतात. रेशीम उद्योगाविषयी माहिती सांगताना कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे म्हणाले की, हा उद्योग प्रामुख्याने तीन विभागात विभागला गेला आहे. पहिला म्हणजे तुती लागवड करून तुती पालानिर्मिती करणे. दुसरा रेशीम अळीचे संगोपन करून रेशीम कोषनिर्मिती करणे. आणि तिसरा विभाग म्हणजे कोष काढणे, रेशीम कोषापासून रेशीम धागानिर्मिती करणे. रेशीम अळीचे मुख्य खाद्य हे तुती झाडाचा पाला आहे. तुतीपाला निर्मितीकरिता पाण्याचा निचरा होणारी, सकस काळी कसदार जमीन आवश्यक असते. तुती झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी जमिनीस शेणखत त्याचबरोबर हिरवळीची खते, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय खतांची गरज आहे. तुती झाडांची लागवड एकदा केल्यानंतर जवळजवळ १५ ते २० वष्रे नवीन तुती झाडांची लागवड करण्याची आवश्यकता नाही. सुधारित पट्टापद्धतीने तुती झाडांची लागवड केल्यास कमीत कमी खर्चात अधिक पालानिर्मिती करता येते. ५ बाय ३ बाय २ या पट्टा पद्धतीचा वापर करायला हरकत नाही, असेही लांडगे यांनी सांगितले. तुती झाडांची लागवडही प्रामुख्याने जून, जुल, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये केली जाते. कलमापासून तसेच तुती रोपाद्वारेसुद्धा लागवड करता येते. कलमापासून तुती लागवड केल्यास कमीत कमी ५ ते ६ महिन्यांत तुतीचे चांगले झाड तयार होते. म्हणजेच तुतीची बाग रेशीम अळी संगोपनास येते. रेशीम उद्योगातील महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे रेशीम अळीचे संगोपन करून रेशीम कोषनिर्मिती करणे. रेशीम अळीचे जीवनचक्र हे अंडी, अळी, कोष व पतंग अशा अवस्था मधून (टप्प्यात ) एकूण ४८ ते ५२ दिवसांत पूर्ण होते. अळी अवस्थेमध्येच फक्त तुतीचा पाला अळ्यांना खाऊ घातला जातो. रेशीम अळीचे संगोपन करण्यासाठी रेशीम कीटक संगोपनगृह बांधणे आवश्यक आहे. रेशीम उद्योगातील तिसऱ्या भागात रेशीम अळीने कोष तयार केल्यानंतर कोष काढून घेऊन त्याची विक्री करता येते. शासनाकडूनही या उद्योगासाठी अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी इतर पारंपरिक पिकांमागे न धावता रेशीम उद्योगाद्वारे स्वत:ला समृद्ध करण्याची गरज आहे. शासकीय अनुदान रेशीम उद्योगासाठी शासनाच्याही काही सवलती आहेत. त्याचा लाभ घेता येईल. शेतकऱ्याला सी.डी.पी. अंतर्गत कीटक संगोपनगृह उभारणीस १ लाख रुपये, १ लाख ५० हजार रुपये व २ लाख रुपये तसेच एकूण प्रत्यक्ष खर्च विचारात घेऊन ५० हजार रुपये, ७५ हजार रुपये आणि १ लाख रुपये अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति एकरी २० हजार रुपये अनुदान दिले जाते. बागेतील ठिबक संच उभारणी एकरी खर्च २० हजार रुपये गृहीत धरून १५ हजार रुपये अनुदान दिले जाते. शासन ५० हजार रुपये किमतीच्या कीटक संगोपन साहित्यासाठी शेतकऱ्यास ३७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांस शासनामार्फत ७५ टक्के अनुदान देऊन त्यांच्या मागणीनुसार अंडीपुजाचा पुरवठा केला जातो. रेशीम धागानिर्मिती युनिट उभारणी (शेडबांधणी व मशीनरी खरेदी) एकूण खर्च दहा लाख रुपये विचारात घेऊन यासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान दिले जाते. ainapurem1674@gmail.com