* ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील जमीन व हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल व पोषक आहे. तथापि, अलीकडील काही वर्षांपासून उसाचे उत्पादन घटत आहे. याउलट, उत्पादनखर्च मात्र वाढत आहे. या कमी उत्पादनाची कारणे शोधून यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाचा काटेकोरपणे उपयोग करणेही गरजेचे आहे. * हंगाम - महाराष्ट्रात ऊसलागवडीचे हंगाम चार आहेत. आडसाली या हंगामात लागवडीचा काळ जून, जुलै हा असतो. तर ऊसतोडणीचा काळ पुढील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर हा असतो. पिकाचा कालावधी १८ महिन्यांचा असून या हंगामात पुणे, अहमदनगर, माळशिरस, फलटण या भागात ऊस लागवड केली जाते. पूर्वहंगामी हंगामात लागवडीचा काळ ऑक्टोबर, नोव्हेंबर असून पुढील वर्षी नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान ऊसतोडणी केली जाते. पिकाचा कालावधी १५ महिन्यांचा असतो. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्य़ांमध्ये या हंगामात प्रामुख्याने लागवड केली जाते. सुरू हंगामात डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत लागवड केली जाते. ऊसतोडणीचा कालावधी पुढील वर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात असतो. पिकाचा कालावधी १२ महिन्यांचा असून मराठवाडा, विदर्भ, धुळे, नंदुरबार व जळगाव या हंगामात लागवड केली जाते. खोडवा हंगामात डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत लागवड केली जाते. पिकाचा कालावधी १२ ते १४ महिन्यांचा असतो. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये लागवड केली जाते.