बीड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली शिवारात उषा दराडे यांनी दोन एकरांत सेंद्रिय पद्धत वापरून बेड प्रणालीने मिरची लागवड केली. बेडवर साडेचार बाय सव्वा अशा अंतराने मल्चिंग पेपर अंथरून मिरचीची उभ्या-आडव्या पद्धतीने रोपे लावली. महिको कंपनीचे तेजा फोर हे गावरान वाण दराडेंनी आपल्या शेतीसाठी निवडले. तिखट असली तरी आरोग्यासाठी लाभदायक असल्याने दराडे यांच्या मिरचीला बाजारात मागणी वाढली आहे. शेतीमधील इतर वनस्पती, दुग्धजन्य पदार्थाचा शास्त्रीय पद्धतीने रोपांना डोस, ताक व गुळाचे आंबवलेले, गोमूत्र, देशी दारू व झिंग्याचा पाला अशा वेगवेगळ्या मिश्रणांची फवारणी करून वाढवलेली ‘मिरची’ विषमुक्त झाली आहे. माजी आमदार उषा दराडे यांनी दोन एकरात सेंद्रिय पद्धतीने मिरची पिकवली. अवघ्या दीड महिन्यात एका झाडाला दीड किलोपेक्षा जास्त मिरच्या लागल्या. पिकवल्यानंतर लाल रंगाची ही मिरची खाण्यासाठी तिखट असली तरी आरोग्यासाठी मात्र लाभदायक ठरणारी असल्याने दराडे यांच्या मिरचीला बाजारात मागणी वाढली आहे. बेड प्रणालीने लागवड बीड शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली शिवारात उषा दराडे यांनी साडेसहा एकरपकी दोन एकरांत मिरची लागवडीचा निर्णय घेतला. पाण्यासाठी विहीर खोदून, खेटून गेलेल्या खटकाळी नदीचा प्रवाह रुंदावा यासाठी नदीपात्राचे खोलीकरण केल्याने जून, सप्टेंबर महिन्यांत विहीर तुडुंब भरली. शेतीतही बिंदुसरा तलावातील गाळ टाकल्याने जमीन अधिक कसदार झाल्याने दोन एकरांत सेंद्रिय पद्धत वापरून बेड प्रणालीने मिरची लागवड केली. प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव, शिवराम घोडके, कृषी विभागाचे अधिकारी आणि धर्यशील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली शेतात गोलाकार उंचवटा करून त्यावर रोप लावणे आणि बाजूला खोटवाट सोडणे अशी बेड प्रणाली केली. बेडवर साडेचार बाय सवा अशा अंतराने मल्चिंग पेपर अंथरून मिरचीची उभ्या-आडव्या पद्धतीने रोपे लावली. महिको कंपनीचे तेजा फोर हे गावरान वाण दराडेंनी आपल्या शेतीसाठी निवडले. ही लागवड जुल २०१६ च्या तिसऱ्या आठवडय़ात केली गेली. शिवाय ठिबक सिंचन पद्धतीने मिरची पिकाला पाणी, औषधी देण्यात येत असल्याने पिकाला हवे तेवढे प्रमाण मिळण्यास मदत झाली. शास्त्रीय आणि सेंद्रिय पद्धतीने संगोपन उषा दराडे यांनी कमीत कमी रासायनिक उत्पादनांचा वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने मिरचीचे संगोपन केले. शेतीतील इतर वनस्पतींचा आणि पशूंच्या दुग्धजन्य पदार्थ आणि मलमूत्राचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून त्याचे डोस रोपांना देण्यात आले. यामुळे मिरची विषमुक्त झाली आहे. सुरुवातीला बेडवर लिंबोळी पावडर आणि सेंद्रिय खत एकराला ४० किलोप्रमाणे टाकण्यात आली. जुल २०१६ च्या तिसऱ्या आठवडय़ात बेडवर मिरचीच्या रोपांची सीपीपीच्या मिश्रणात मुळे बुडवून लागवड करण्यात आली. लागवडीवेळी दशपर्णी अर्क तयार करण्यात आले. हे अर्क निसर्गातील दहा किंवा त्यापेक्षा जास्त वनस्पतींपासून तयार केलेले असते. ज्या पानांना शेळीही खात नाही अशा पानांपासून हे अर्क तयार केले जाते. शंभर लिटर पाण्यात एक किलोग्रॅम दशपर्णी, वनस्पतींचा एक किलो पाला आणि दहा लिटर गोमूत्र हे मिश्रण सावलीच्या ठिकाणी एक महिना सडवावे लागते. दशपर्णी अर्क रोपांना सुरुवातीलाच दिल्याने त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढली. पुढे रोपे वाढू लागल्यानंतर रासायनिक फवाऱ्यांचा वापर निव्वळ कमी व्हावा यासाठी एक अनोखी सेंद्रिय फवारणी करण्यात आली. यामध्ये शेणखत, शेळीचे खत, वडाखालची माती, वारुळाची माती, लिंबोळी पावडर, बीएससी पावडर, बायोडायनामिक कंपोस्ट खत हे मिश्रण एक महिना सडवले. एक महिन्यानंतर १५ लिटर पाण्यात १५ मिलिगॅ्रम हे मिश्रण मिसळून मिरचीवर फवारणी करण्यात आली. रासायनिक फवारणी औषधांच्या वापरामुळे पिकांवर आणि जमिनीवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हा सेंद्रिय फवारा अत्यंत उपयुक्त ठरला. ही पहिली फवारणी ३ ऑगस्ट २०१६ रोजी करण्यात आली. दुसरी दहा दिवसांच्या अंतराने फवारणी १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. तिसरी फवारणी पुन्हा २३ ऑगस्टचा वरील प्रमाणानुसार करण्यात आली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीत अल्प प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिरचीची रोपे लागवडीनंतर आठ दिवसांनी विगर नावाचे औषधाची ५०० मी. लि. पावडर दोनशे लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे देण्यात आले. याबरोबर सुरुवातीलाच ह्य़ुमिक अॅसिड, मायक्रोला, १९१९१९ खत पाच किलोग्रॅम, युरिया ३ किलोग्रॅम पाण्यात मिसळून तीन-तीन दिवसांनी डोस देण्यात आला. पुढची फवारणी २१ ऑगस्टला करण्यात आली. २७ ऑगस्ट रोजी वातावरणातील बदलामुळे मिरचीची पाने जराशी आखडल्यामुळे डेटास २ औषध फवारण्यात आले. रोपांना सोसेना भार.. पिकाची काळजी मुलांप्रमाणे घेतल्याने मिरचीची रोपे डोलदार झाली. साधारण लागवडीच्या एक महिन्यानंतर या रोपांना फुले लागली. पुढे एक महिन्यानंतर मिरचीच्या झाडाला एवढय़ा मिरच्या लगडल्या की झाडालाच मिरचीचा भार सोसवत नव्हता. संपूर्ण बेडला डेरेदार मिरचीने जणू झाकोळून टाकले होते. त्यामुळे झाडे वाकून गेली होती. दीड महिन्यानंतर हिरव्या मिरच्यांची तोड आली. एका झाडाला दीड किलोपर्यंत मिरच्या लगडल्या होत्या. चार ते पाच क्विंटल मिरची तोडून भाव कमी येत असल्यामुळे बाकी पिकेपर्यंत ठेवल्या. सध्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात लाल मिरचीची तोडणी सुरू आहे. पाच ते सात क्विंटल मिरची निघू शकते, असा अंदाज दराडे यांनी बांधला आहे. त्यांना साधारण ५५ हजार रुपये उत्पादन खर्च आला. एक ते दीड लाख रुपये उत्पन्न निघू शकते. हा पहिला तोडा सुरू असून असे दोन ते तीन तोडे चांगले उत्पन्न देणारे होतील. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मिरचीला बाजारात मोठय़ा प्रमाणावर मागणी येत आहे. शिवाय दराडेंनी पिकवलेले वाण हे गावरान म्हणजे देशी पद्धतीचे आहे. विशेष फवारण्या आपण कधी ऐकल्याही नसतील अशा अनोख्या आणि विशेष फवारण्या पिकांच्या आरोग्यासाठी दराडे यांनी केल्या. पहिली अशी- तांब्याच्या भांडय़ात एक लिटर ताक आणि शंभर ग्रॅम गूळ झाकून ठेवून सात दिवस हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ ढवळण्यात आले. सात दिवसांनंतर पंधरा लिटर पाण्यात अडीचशे मिलिग्रॅम मिश्रण मिसळून सप्टेंबर महिन्यात याच्या दोन फवारण्यात करण्यात आल्या. यामुळे पिकांचे पोषकतत्त्वे वाढू शकले. तसेच दुसऱ्या पद्धतीत, ९० मिलिग्रॅम देशी दारू, १५० मिलिग्रॅम गोमूत्र यांचे द्रावण १५ लिटर पाण्यात टाकून याच्या तीन वेळा फवारण्या करण्यात आल्या. तिसऱ्या प्रकारच्या फवारणी प्रक्रियेत गाईच्या दुधाचे एक लिटर ताक आणि १५ लिटर पाणी हे मिश्रण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत तीन वेळा फवारले आहे. चौथ्या प्रकारात दोन टापले गाईचे शेणखत, १ किलोग्रॅम गूळ, १ किलोग्रॅम बेसन पीठ, दहा लिटर गोमूत्र, वडाच्या झाडाखालील माती आणि दोनशे लिटर पाणी सात दिवस ढवळून हे मिश्रण फवारणी न करता थेट पिकाच्या बुंध्याला देण्यात आले. तसेच िझग्याच्या पाल्याचा चुरा प्रति एकर दहा किलोप्रमाणे थेट पिकाच्या बंध्याशी बांगडी पद्धतीने टाकण्यात आला. यामुळे मिरची पीक जोमाने वाढले. त्याला फुले मोठय़ा प्रमाणावर लागली. शिवाय अतिवृष्टी आणि हवामानातील बदलाचा आणि रोगराईचा कसलाच परिणाम मिरचीला झाला नाही, हे विशेष! केवळ एक-दोन वेळा पाने आखडली. दुसऱ्यांदा पाने आखडल्यानंतर ट्रायझोफॉस ३ मिली आणि सर्फ पावडर पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली गेली. या सर्व पद्धतींमुळे अतिवृष्टीतही पिकांची पाने पिवळी पडली नाहीत. अशा प्रकारे मिरचीची काळजी घेतल्याने दराडेंना भरघोस उत्पन्न मिळाले आहे. वसंत मुंडे vasantmunde@yahoo.co.in