जंगल, झाडं, पानं, फुलं, फांद्या या सगळ्यांशी हितगुज करताना जीवनाचा अर्थ आपल्याला आकळत जातो. जगण्याची शहाणीव येते. त्या शहाणीवेच्याच मग कविता बनतात…

पानगळीत जेव्हा पानं झडू लागतात

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
Loksatta career article about A career in singing
चौकट मोडताना: गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा

पानगळीत जेव्हा पानं झडू लागतात
काय सांगत असतील तेव्हा ती फांद्यांना?

आम्ही तर आमचा मोसम जगून जातोय
तुम्ही आनंदात राहा-
तुम्हाला तर हरएक मोसमाच्या मुलाबाळांचा सांभाळ करून
त्यांना निरोप द्यावा लागणारेय

जेव्हा फांदीची वेळ आली होती तोडलं जाण्याची
तेव्हा ती झाडाला म्हणाली.. स्वत:च म्हणाली-
‘माझंही आयुष्य तुला मिळो..
तुलाऽ वाढत जायचंय, उंचच उंच व्हायचंय
माझ्या जागी येईल दुसरी, नको मला आठवणीत ठेवूस!’

आपल्या मुळांना खोलवर खोदून खोदून
जमिनीपासून उखडून वेगळं करण्यात आल्यावर
झाड तरी जमिनीला काय म्हणणार!

उलट जमिनीलाच म्हणावं लागलं-
आठवतंय, जेव्हा तुला पहिलं पान फुटलेलं
एका छोटय़ाशा बीजातून तू डोकावून पाहिलं होतंस
पुन्हा येशील, माझ्याच पोटी जन्म घेशील
जर मी राहिली-वाचली तर!

झाडांचा पेहराव..

झाडांच्या पेहरावावरून एवढं-तेवढं तर आम्हाला कळूनच जातं
मोसम आता बदलणारेय!
नवीन झुमके कानात लटकलेले पाहून कोकिळा खबर देते
आंब्याला मोहोर आलाय!

आपल्या पानांना सोडचिठ्ठी देऊन ग्रीष्मात जेव्हा गुलमोहोर होतो नंगा
तेव्हा गरमीचा मोसम सुरू होणार असल्याचं कळतं.
आणि तोच जेव्हा हिरव्या तृणांवरील तांबडा-पिवळसर पेहराव करतो
तेव्हा चाहूल लागते पाऊसभरल्या ढगांची!

पहाडातून वितळून ‘पाईन’चे पाय धुण्यासाठी बर्फ जेव्हा वाहतो
झाडांच्या पानांना हलवून वारा त्याला चमकवू लागतो

पण जेव्हा घुसू लागतात मानवी वस्त्या
हिरव्या पाऊलवाटांचे पायही बदलू लागतात रस्ते
तेव्हा सगळ्या झाडांना कळून चुकतं, आपली कटण्याची वेळ समीप आलीये
बस्स.. हाच आखरी मोसम आहे जगण्याचा, ती जगून घ्या!

फांद्यांमधून झिरपत उन्हाची बोटं..

फांद्यांमधून झिरपत उन्हाची बोटं
झाडांच्या मांडय़ांना जेव्हा झुकून कुरवाळतात
मी पाहिलंय त्यांना लज्जेनं चूर होत तक्रार करताना-
लोक माझ्याबद्दल वाईटसाईट गोष्टी तर पसरवतातच, आणि वर..
चाकूनं नावही लिहून जातात माझ्याच मांडय़ांवर!

त्यांना लाख सांगा- फरकच पडत नाही!!

पिंपळ

कित्ती कचरा करतो हा पिंपळ अंगणात
आईला दिवसातून दोन-दोनदा झाडू मारावा लागतो

कसे कसे दोस्त-यार येतात याचे
खायला त्यांना हा पिंपळ्या देतो
अख्खा दिवस फांद्यांवर बसलेली कबुतरं, राघू
गिळतात थोडं अन् फेकतात जास्त
वरून बिया, आठोळ्या अंगणातच टाकून जातात

चिमण्यांनीही घरटी बांधलीये एका डहाळीवर
त्याचा काडीकचरा दिवसभर उडत राहतो अंगणातच
कळत नाही, एका खारुला
पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कसली घाई असते
धावूनधावून दहादा तरी सगळ्या फांद्या फिरून येते
शेंडय़ावर बसलेली घार
कधी वेडय़ासारखी स्वत:शीच बडबडत असते
शेजाऱ्यापाजाऱ्याशी झटपून, लुटून आणलेली हाडकं
हे बेशरम कावळे
पिंपळाच्या फांदीवरच बसून खातात
आणि वरून म्हणतात, ‘पिंपळ पक्का ब्राह्मण आहे’!
त्यांना हुसकावण्यासाठी आई ‘हुश-हुश’ करते तेव्हा
‘काव काव’ करत हे सगळेच मांसखोर
तिच्याच अंगावर हाडकं फेकून फुर्रऽ होतात
तरीही का कुणास ठाऊक, आई म्हणत असते-
‘‘अरे कावळ्या.. माझ्या श्राद्धाच्या वेळी येशील तू! येशीलच बरं!!’’

या जंगली रोपटय़ांच्या डहाळ्यांवर…

या जंगली रोपटय़ांच्या डहाळ्यांवर
काही शब्द येतात कधीतरी लगडून
पण फुलून येत नाही संपूर्ण कविता!

या रोपटय़ांना मिळत नाही असा खुराक, की
त्यांची मुळं घट्ट पकडून राहतील मातीला
मुळं सुरक्षित राहावी म्हणून या रोपटय़ांना मिळत नाहीत कुंडय़ाही..
त्यांना रस्त्यांवरच फेकून दिलं जातं
धूळ, भूक अन् दयेवर कसेतरी जगत
त्यातलंच एखादं कधी कुणी
ठोकर खाऊन जाऊन पडतं वाहत्या नाल्याच्या चिखलात
माती, पाणी मिळाल्यानं ते तिथंच जोर धरू लागतं!

पुन्हा एक सडक
आणि एक नवी ठोकर
आणि एक ‘दलित’ रोपटं!!

त्या वळणावर पाहिलंय!

तुम्ही कधी पाहिलंय त्या वळणावरील झाडासारखं एखादं झाड?
माझ्या परिचयाचंय ते, कित्येक वर्षांपास्न मी त्याला ओळखतो

जेव्हा मी लहान होतो तेव्हा एक आंबा गुल करण्यासाठी
लगतच्या भिंतीवरून त्याच्या खांद्यावर चढलेलो
कुठल्या दुखऱ्या फांदीवर पाय पडला कोण जाणे
धाडकन् खालीच फेकून दिलं त्यानं मला
खुन्नसमध्ये मीही खूऽप दगड भिरकावले होते त्याच्यावर

मला आठवतंय, मी बोहोल्यावर चढत असताना
विधीतला हवन डहाळ्या देऊन प्रज्ज्वलित केला होता त्यानं
आणि जेव्हा ‘बीबा’ गर्भवती होती तेव्हा रोज दुपारी
त्यानंच कैऱ्या दिल्या होत्या माझ्या बायकोसाठी

बदलत्या काळासोबत त्याचा सगळ्ळा मोहोर, सगळी पानं झडली

जीव तेव्हाही जळायचा जेव्हा ‘बीबा’ बाळाला म्हणायची-
‘हो रे, त्याच झाडावरून आलायेस तू, त्याचंच फळ आहेस’
मन आताही जळून जातं, त्या वळणावरून जाताना जेव्हा
खाकरून तो म्हणतो, ‘काय..? गेले ना डोक्यावरले सगळे केस?’

सकाळपासूनच त्याला तोडताहेत ते कमिटीवाले
त्या वळणापर्यंत जायची हिंमतच नाही माझ्यात!

पानगळ

झाडू घेऊन वृक्षराजींची पानं का पाडत फिरतेय ही पानगळ
झालंय तरी काय हिला?
कशी वेडय़ासारखी भटकत असते, जणू मिटवू पाहतेय
पिवळ्या पानांवर लिहिलेलं एखादं गुपित…

तिला भीती आहे
वसंत फुलला तर वाचून घेईल
वेळेवर न येणाऱ्या मोसमांचं ते गुपित
कोणताच मोसम नेहमीसाठी थांबून राहात नाही!!

झाडं जेव्हा विचारात हरवू लागतात

झाडं जेव्हा विचारात हरवू लागतात, फुलं उमलू लागतात
उन्हाच्या शाईनं आपल्या बोटांनी
हेलकावणाऱ्या फांद्यांवर ते जेव्हा मनातलं उतरवतात
तेव्हा नाना तऱ्हेच्या रंगछटा शब्दांचे रूप घेतात
सुगंधाशी बोलतात आणि बोलावतातही

मात्र आमची हौस बघा..
मुळासकट खुडूनच टाकतो आम्ही त्याला
जिथं कुठं कुणी गंध उधळताना जाणवलं!

मी जंगलातून जाऊ लागतो तेव्हा…

मी जंगलातून जाऊ लागतो तेव्हा वाटतं, माझे पूर्वजच उभे आहेत
मी एक नवजात बालक आणि
झाडांचे हे समूह
उठून हातांनी झुलवताहेत मला
हाताने कुणी फुलाफुलांचा खुळखुळा वाजवतोय
तर कुणी पापण्यांवर सुगंधाची फुंकर मारतोय
दाढी असलेलं एक जख्खड वडाचं झाड
हैराण आहे मला कडेवर उचलून उचलून
ऐकवतंय ते मला-

‘तू आता चालायला लागलायेस!
आमच्यासारखाच होता तूही : तुझी मुळंही याच मातीत राहायची
गाभ्यातून सूर्याला पकडण्यासाठी तू खूप जोर लावायचास
तू पृथ्वीवर नुकताच आल्यावर
तुला पुन्हा रांगताना पाहिलेलं..
आमच्या फांद्यांवर चढून जायचास, कुदायचास, मस्तीत यायचास
पण दोन पायांवर उभं राहून तू जेव्हा धावायला शिकलास
पुन्हा परतला नाहीस
पहाडा-दगडांचा हिस्साच झालास तू!
पण तरीसुद्धा..
तुझ्या कुडीत पाणी आहे
माती आहे तुझ्या कुडीत
तू आमच्यातूनच आहेस..
आमच्यातच पुन्हा रुजवला जाशील, तू पुन्हा परत येशील!’

चिंच

कोसबाडच्या चौकात

उभंय एक धटिंगण झाड.. चिंचेचं
त्याचा राग जातच नाही
आल्यासारख्या मोठमोठय़ा गाठी पडल्याहेत त्याच्या बेचक्यात
सारा दिवस खाजवत राहतो, खरुज आहे नं!

ज्या वळणावर ते आहे, तिथं जेव्हा बसेस थांबतात
घाईगडबडीत त्याच्या अंगावरच विडय़ा विझवून
लोक बसेसमध्ये चढतात
कधी पानाच्या पिचकाऱ्याही मारतात
त्याच्या डहाळ्या लोकांनी चाकूनं कापल्यात
उभ्याउभ्या कुणी उगाचच फेकत असतं त्याच्यावर ढेकळं
त्यामुळेच त्याचा राग जात नाही

भुरकट लाल कोळ्यांना
ते नेहमी जिवंतच गिळतं
उडय़ा-उडय़ांचा खेळ खेळणाऱ्या गबरू खारूला तर
हात झटकून फेकूनच देतं ते
मुंग्या पाळल्याहेत त्यानं
जरा कुणी त्याला टेकलं वा घासलाच जुता तर
चक्क मुंग्याच सोडून देतं ते त्यांच्यावर

त्याचा राग कमीच होत नाही
कोसबाडच्या चौकात
उभंय एक धटिंगण झाड.. चिंचेचं!
गुलजार, अनुवाद : किशोर मेढे

बाप

जगातल्या प्रत्येक मातृभाषेत
एखादा तरी बाप असेल माझ्यासारखा
जो आपल्या मुलाला
द्वेष या शब्दाचा अर्थ
समजावून सांगण्यासाठी धडपडत असेल
केविलवाणा होत असेल जेंव्हा
मुलाला कहीच कळत नसेल

तेंव्हा खरं तर तो स्वत:चाच द्वेष करत असेल
आपल्या भाषेतून द्वेष हा शब्द आपल्याला
कायमचा हद्दपार करता नाही आला म्हणून
सैरभैर नजरेने शोधत असेल आसपास
ते लोक जे दंगली घडवतात
बॉम्ब उडवतात
युद्ध करवतात

ते युद्ध सुरू होईल
तेंव्हा तू किती वर्षांचा असशील ठाऊक नाही
मी जिवंत असेन तर
सांगेनच तुला चार गोष्टी माणुसकीच्या
तोवर तुझी मातृभाषा तू विसरला नसशील तर

कारण
मातृभाषेतच तुला कळू शकेल
प्रेम या शब्दाचा अर्थ
तो कळाला की आपोआपच
द्वेष म्हणजे काय हे लक्षात येईल तुझ्या
तू मोठा झाल्यावर
माझ्याइतक्याच काळजीने
तुझ्या मुलालाही तू समजावू पाहाशील
तेंव्हाही तू माझाच मुलगा असशील
कारण माझ्या बापामधूनच
वाहात आलिये ही समजावण्याची धडपड

युद्ध सुरू होईल
दंगल पेटेल
तेंव्हा तुझा मुलगा कुठे असेल ठाऊक नाही
बॉम्बस्फोटाची बातमी ऐकून
माझ्यासारखीच सर्वप्रथम तुला
त्याची आठवण येईल

तू जिवंत असशील
तर सांगशीलच त्याला
माणुसकीच्या चार गोष्टी
फक्त तेंव्हा
तुझी भाषा कुठली असेल
ठाऊक नाही
कारण मातृभाषेतच कळू शकतो
आई या शब्दाचा अर्थ

तो कळाला
की आपोआपच
बाप म्हणजे काय
हे लक्षात येईल तुझ्या.

सौमित्र

शोध

श्वास देहात साठला, देह धुक्यात लोटला,
धुक्यामधे शोधू वाट? पुढे अंधार दाटला.

काय शोधाया निघाले? कुठे येऊन ठेपले?
कसे अनोख्या दिशेने असे पाऊल पडले?

पुढे काहीच दिसेना, तरी शोध थांबवेना,
धुक्यापल्याडचे कोण हाकारते ते कळेना.

वाट अनवट पुसट, चालताना फरफट,
तरी जिंकावासा वाटे अनोळखी सारीपाट.

पाय चालून थकले, जुने सारे दुरावले
मोडण्याच्या या क्षणाला सारे धुकेच फाटले.

धुके फाटल्याच्या क्षणी सारा शोधही थांबला
तुझ्या एका दिसण्याने शांत झाला गलबला.

स्वच्छ पांढरा प्रकाश, त्यात तुझा सहवास
माझ्या दाटल्या श्वासाला आता फक्त तुझी आस.
मुक्ता बर्वे

चांदवा

गंधओल्या धुंद वेळी रे मना तू धाव घे..
साद घालत आर्त भोळी अंतरिचा ठाव घे..
सांज ढळता सूर्य कलता चंद्र सजवी कोर ग..
अन् सखीच्या लाजण्याचा या जिवाला घोर ग..
भरून आले नभ सखे ग विरून गेल्या चांदण्या..
रातराणीच्या कुशीतच का तुझ्या या मागण्या..
मिट्ट काळ्या चिंब राती या तनुचा काजवा..
गुज सांगे रातीला लपला मिठीतच चांदवा..

प्रसाद ओक

त्याला नका उठवू

तो झोपलाय
त्याला नका उठवू..
एकदा स्वप्नाच्या शोधात
तो आणि त्याच्या आईची सावली
या शहरात आले
घामाघूम झाले
तहानले, भुकेले
खूप फिरले
पहात पहात
मोठमोठाले इमले.
उपासतापास
गंडेदोरे
तरी नशिबी
अभागी सारे
तो झिजला विझला
उभा राहिला
कमावलं नाव-पैसा
पत्तागुत्ता
स्वत:च्या हक्काचा..
तो पेपरात झळकला
त्याचा सूर्य तळपला
घराघरात त्याचा चेहरा
परतेकानं वळकला..
तो मोठा झाला
त्याची गाडी आली
बायको, प्रेयसी
छमवायला माडी आली
मानमरातब
मोठ्ठे दरबार
सामाजिक सोटे
पुरस्कार..
सग्गळं मिळालं
आणि अचानक
एक दिवस
त्याला अपघात झाला
तो स्वत:लाच धडकला
आपसूक
अन् कोमात गेला..
गुन्हा नोंदवलाय
त्याच्याच नावावर
जखमी तोच
अपराध त्याचाच
आणि वैदूही तोच
आता वैश्विक सत्य असलेली
भाकरी आणायला
गेलीये त्याची म्हातारी
तो मेलाय खरं तर कधीच
पण  जो  झोपलाय
त्याला नका उठवू..
जितेंद्र जोशी

चटका

चाळवी जेव्हा चेंगट चिंता
नैराश्याचा नकटा नारद
दुर्दम्यावर ठेचून त्याला
तिथेच करतो पुरता गारद

आडमुठी उद्दाम उदासी
व्यापून बसता बुरुज मनाचा
बसक्या बथ्थड तिच्या बुडाला
चटका देतो चैतन्याचा

नाचवुनी भलभलती भुते
जेव्हा छळते भटकी भीती
पिटाळतो तिज कर्तव्याचा
कडवा चाबुक घेऊन हाती

गांभीर्याच्या नाकावर मग
टिच्चून बसतो होऊन माशी
बेफिकिरीचे पंख ताणुनी
हसू उधळतो मी अविनाशी
गुरू ठाकूर