पंतप्रधान विमा योजना सुरु झाल्यापासून पहिल्याच आठवडय़ात नगर जिल्ह्य़ात  ८३ हजार अर्ज, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेचे ३६ हजार ३४३ अर्ज व अटल निवृत्ती योजनेचे ८ अर्ज जमा झाले आहेत.
पंतप्रधान जीवन सुरक्षा व जीवनज्योती विमा योजनेची सुरुवात काल, शनिवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. अटल निवृत्तीवेतन योजना १ जूनपासून सुरु होत आहे. सुरक्षा विमा योजने अंतर्गत वार्षिक १२ रु. प्रिमिअम भरुन १८ ते ७० वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस १ लाखाचा व त्याच्या कुटुंबाला २ लाखांचा अपघात विमा संरक्षण, जीवनज्योती विमा योजने अंतर्गत कोणत्याही बँकेत खाते असणाऱ्या १८ ते ५० वयोगटातील व्यक्तीला वार्षिक ३३० रु. प्रीमियम भरुनोयुर्विमा संरक्षण मिळणार आहे. विमाधारकाचा ५५ वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रु.चे संरक्षण मिळणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी अटल निवृत्ती योजना आहे, त्यात ४० वर्षांच्या आतील व्यक्तीला सहभागी होता येणार आहे. ६० वर्षांनंतर भरलेल्या रकमेनुसार १ ते ५ हजार रु. दरमहा निवृत्तीवेतन दिले जाणार आहे.
बँकांनी या योजनांकडे संकट म्हणून न पाहता, लोकसंपर्क वाढवण्याची संधी म्हणून पहावे, बुद्धिमता  व माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेवरील विश्वास वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन कवडे यांनी यावेळी बोलताना केले. नियोजन भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमास सेंट्रल बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक पी. पी. नाचनकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व्ही. टी हुडे आदी उपस्थित होते.