अकोट तालुक्यातील आलेवाडी येथे बंद कारमध्ये गुदमरून एका १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  तानेश विष्णू बल्लाळ असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आजी व मावशीसोबत प्लास्टिकचा कचरा वेचण्यासाठी आलेवाडी गावात आला होता.

आलेवाडी येथे झाडा झुडपात एक कार गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत उभी होती. मंगळवारी तानेश खेळता खेळता या कारमध्ये जाऊन बसला. मात्र, याच सुमारास कारचे दरवाजे आतून बंद झाले आणि तानेश कारमध्येच अडकला. तानेशचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी तानेश दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर तानेश बंद कारमध्ये सापडला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दहिहंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.