लॉकडाउन खत्म होने के बाद फिर से आना.. जहा, काम किया है वहा काम मिलेगा… अशा आश्वासक शब्दात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधत झारखंडच्या मजुरांना आज  निरोप दिला. यावर महाराष्ट्र के भरोसे हमारी रोजीरोटी है… हम लोग आपका प्यार कैसे भुला देंगे… असे भावपूर्ण उद्गार काढत जिल्ह्यातील झारखंडच्या मजुरांनी आज चंद्रपूर शहराचा निरोप घेतला.  विजय वडेट्टीवार यांनी त्यांना आज निरोप दिला.

जिल्ह्यातून जवळपास साडेबाराशे मजुरांना रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. बिहार, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड अशा विविध राज्यात नागपूर, वर्धा येथून रेल्वेने मोठ्या प्रमाणात मजूर आपल्या प्रांतात जात आहेत. या मजुरांना महाराष्ट्राने रोजगार दिला आहे. वर्षानुवर्षे हे मजूर याठिकाणी राहत आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर सोडतांना त्यांचे अंतःकरण जड झाले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  या मजुरांना निरोप देण्यासाठी पडोली परिसरात भेट दिली. यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड उपस्थित होते.

आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून झारखंडच्या मजुरांना रवाना करण्यात आले. त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था तसेच त्यांच्या रेल्वेच्या तिकिटांची व्यवस्था देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली. ते झारखंडच्या डालटंन गंज या स्टेशनला पोहचणार आहेत. सोबतच त्यांच्या अन्न-पाण्याची  देखील यावेळी व्यवस्था करण्यात आली .

जिल्ह्यातून नागपूर पर्यंत जाण्याची व्यवस्था बसने मोफत करण्यात आली होती. त्यांना पाच जेवणाची, चहा पाण्याची व्यवस्था करून बसच्या माध्यमातून सोडण्यात आले. सॅनीटायझरचा वापर करा, शारीरिक अंतर ठेवून बसा,  परस्परांना स्पर्श करू नका, अशा सूचना यावेळी लोकप्रतिनिधींनी केल्या. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अतिशय भावनिक वातावरणात मजुरांनी देखील लोकप्रतिनिधीने सोबत चर्चा केली.येत्या काळामध्ये पश्चिम बंगाल, गुजरात, जम्मू कश्मीर व अन्य उत्तरेकडील राज्यासाठी रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे.