राज्यातील अतिसंवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या आक्रमक रणनितीमुळे नक्षल चळवळीचा कणा मोडला असून बंदुकीच्या जोरावर आदिवासी बांधव व गरीब जनतेची दिशाभूल करणाऱ्या नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना मोठय़ा प्रमाणावर यश आले आहे. त्याचीच फलश्रृती म्हणून गेल्या दहा वर्षांत पोलिसांनी १२६५ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, त्यात महाराष्ट्र राज्य समिती सदस्य, डिव्हिजनल सेक्रेटरी, एरिया कमांडर, दमल कमांडर, अशा वरिष्ठ नक्षल कॅडरचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात १९८० च्या दशकात नक्षल चळवळीला सुरूवात झाली. आदिवासी जनतेच्या मागासलेपणाचा फायदा घेत हे नक्षलवादी आदिवासींना भूलथापा देत आहेत. लोकशाहीत मिळालेले स्वराज्य खोटे आहे, असा अपप्रचार नक्षलवादी वारंवार करतात. एवढेच नव्हे, तर भोळय़ा भाबडय़ा आदिवासींना दहशतीत ठेवून त्यांना मारहाण, हत्या, ठेकेदाराकडून खंडणी वसुली, रस्त्याची नासधूस, शासकीय विकास कामे रोखणे, वाहनांची जाळपोळ, दूरसंचार टॉवर व साहित्याची जाळपोळ, तसेच शहरी भागात विविध सामाजिक संघटनांच्या नावावर नक्षल विचारांचा प्रसार व प्रचार करून समाजात तेढ व अशांतता निर्माण करणे असे गुन्हेगारी कार्य नक्षलवादी करत आहे. २००५ मध्ये महाराष्ट्र राज्य समिती सदस्य व्ही.शंकर आझाद उर्फ मदनलाल कनकय्या आणि सिरोंचा महादेवपूर दलम कमांडर रमाकांत उर्फ श्रीनिवास सिन्नू मलय्या चौधरी यांच्यासह ३०२ नक्षलवादी व त्यांचे समर्थक, २००६ मध्ये ९३, २००७ मध्ये उत्तर गडचिरोली- गोंदियाचा डिव्हिजनल सेक्रेटरी मुरली उर्फ महेश उर्फ अशोक सत्या रेड्डी, महाराष्ट्र राज्य समिती सचिव श्रीधर उर्फ विष्णु श्रीनिवासन आणि महाराष्ट्र राज्य समिती सदस्य विक्रम उर्फ प्रदीप उर्फ स्टॅलिनॉस गोन्साल्व्हीस याच्यासह १३८, २००८ मध्ये दलम कमांडर सगुणा उर्फ संगीता गौजे सत्यजय उर्फ मल्लेराजारेड्डी, जयअक्का उर्फ मुतक्का गौपी नैताम, करप्पा उर्फ मदनच्या पोट्टी शंकर आत्राम, संतोष उर्फ लक्ष्मण जंगु मडावी यांच्यासह १२४, २००९ मध्ये डिव्हिजनल कमांडर विश्वनाथ उर्फ गणु उर्फ गणपत राजा कुळमेथे यांच्यासह १६९, २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य समिती सदस्य प्रभाकर पदा भिमरय्या सुर्या देवरा, भीमराव मंगल भोवते उर्फ भानू उर्फ भास्कर, दमल कमांडर श्रीनिवास उर्फ मंगन्ना अशोक सबाराम बोरला यांच्यासह ९२, २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य समिती सदस्य अंजल उर्फ इसकारा उर्फ कविता उर्फ सुनिता पाटील उर्फ रमा मिलिंद तेलतुंबडे, दलम कमांडर सोमाजी उर्फ कोदिया उर्फ संतोष आयतु मडावी यांच्यासह १२० नक्षलवादी व समर्थकांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या २०१२ मध्ये दलम कमांडर सरदु उर्फ सरजु घोरू झोरे, प्रकाश उर्फ देविदास उर्फ अडवे उर्फ मुरा गावडे, बिच्छु उर्फ बिरजु आसिफ रामा उईके, बररू राजवंशी शिरसाम उर्फ दिनेश उर्फ क्रिष्णा यांच्यासह १२६, २०१३ मध्ये ५८, २०१४ मध्ये डिव्हिजनल समिती सदस्य राजु उर्फ जेटुराम बुधराम धुर्वा, दलम कमांडर श्यामलाल उर्फ कमलेश रूपसिंग गावडे, एरिया कमिटी सदस्य अरुण भानुदास भेलके, कांचण अरुण भेलके, कमांडर डुंगा उर्फ येशू उर्फ वसंतराव बापु टेकाम यांच्यासह २९ नक्षलवादी आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली, तर २८ फेब्रुवारी २०१५ पयर्ंत डिव्हीजनल कमेटी सदस्य शिवाजी उर्फ मैनू आयवा यांच्यासह एकूण ९ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली.