मुंबई-गोवा महामार्गावर लांजाजवळ आंजणारी घाटात रविवारी पहाटे खासगी आरामगाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार, तर १८ जण जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

मुंबईहून गणेशोत्सवासाठी चाकरमानी प्रवाशांना घेऊन येत असलेल्या विशाल ट्रॅव्हल्स या बसच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या या अपघातात प्रकाश रावजी लबदे (रा. विरार) आणि कृष्णा दत्ताराम कुळये (रा. सांताक्रूझ) या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू ओढवला.

पहाटे अडीचच्या सुमारास महामार्गावरील पाली येथे  चालक बस ताब्यात घेऊन पुढे निघाला असता सहा किलोमीटर अंतरावर आंजणारी घाटात हा अपघात घडला.  गाडी घाट उतरत असताना नियंत्रण सुटल्याने उलटून दरीत कोसळली.  या अपघातामध्ये बहुसंख्य प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील होते. त्यापैकी १८ जण जखमी झाले. त्यांना आधी लांजाच्या ग्रामीण रुग्णालयात आणि जास्त जखमी असलेल्या चौघा जणांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.