राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढत आहे. सर्व सामान्यांबरोबरच अगदी आजीमाजी मंत्र्यांपासून करोना योद्धे संबोधल्या जाणार पोलिसांना देखील करोनाचा दिवसेंदिवस अधिकच संसर्ग होताना दिसत आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दरररोज भर पडत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांच्या संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात आणखी २४७ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला असून, दोघांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता २० हजार ३ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार ७२८ जण, करोनामुक्त झालेले १६ हजार ७१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २०४ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील २० हजार ३ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार १६३ अधिकारी व १७ हजार ८४० कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार ७२८ पोलिसांमध्ये ४४७ अधिकारी व ३ हजार २८१ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या १६ हजार ७१ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ६९६ व १४ हजार ३७५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या २०४ पोलिसांमध्ये २० अधिकारी व १८४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.