राज्यात दिवसभरात २,६३० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १५,५३५ अॅक्टिव्ह रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा ९५.२३ टक्के इतका झाला आहे. तसेच दिवसभरात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात २६३० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २०,२३,८१४ वर पोहोचली आहे. तर १,५३५ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या १९,२७,३३५ इतकी झाली. तसेच दिवसभात ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजवर मृत्यू झालेल्यांची संख्या ५१,०४२ वर पोहोचली.

दरम्यान, राज्यात सध्या ४४,१९९ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच सध्या १,९१,९७५ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २,३२४ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर ठाण्याचा क्रमांक आहे. पुण्यात सध्या १३,५०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाण्यात ७,६७७ आणि त्यानंतर मुंबईत ५,७६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.