आमिष दाखवून कोटय़वधीला गंडवणाऱ्या केबीसी घोटाळय़ात आता २६६ तक्रारदारांनी पोलिसांकडे लुबाडणूक झाल्याचे कळवले आहे. दाखल केलेल्या तक्रारीतून १९ लाख रुपयांना गंडवल्याचे सांगण्यात येत आहे. लोहगाव येथील एका व्यक्तीने बँक कागदपत्रांच्या आधारे तक्रार करण्याचे ठरवले आहे.
गेल्या काही दिवसांत हिंगोली जिल्हय़ात २१ तक्रारी आल्या होत्या, मात्र बहुतेकांचे स्वरूप मोघम होते. त्यामुळे केबीसी विरोधातील तक्रारी जाणून घेण्यासाठी हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी एका स्वतंत्र कक्षाची स्थापना केली.
केबीसी गुंतवणूक करणे धोक्याचे असल्याची सूचना पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांनी जानेवारी २०१४ मध्ये दिली होती. तेव्हा गरज पडल्यास तक्रार द्या, चौकशी करू असेही सांगण्यात आले होते, मात्र आमिष एवढे मोठे होते, की पोलिसांच्या आव्हानाकडे लोकांनी दुर्लक्ष केले. नाशिक आणि परभणी येथे गुन्हे दाखल झाल्यानंतर हिंगोली जिल्हय़ात २१ तक्रारी दाखल झाल्या. स्वतंत्र कक्ष स्थापन झाल्यानंतर २६६ जणांनी तक्रार दाखल केली, मात्र तक्रारीचे स्वरूप मोघम असल्याने अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रारीचे स्वरूप तपासले जात आहे.