महाराष्ट्रात करोनाचे २८८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ३२०४ एवढी झाली आहे. मागील १२ तासांमध्ये महाराष्ट्रात करोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनामुळे १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्राच्या काळजीत नक्कीच भर घालणारी ही बातमी आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढते आहे. ३ हजारांपुढे रुग्णसंख्या असलेलं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

महाराष्ट्रात आणि देशात करोनाचा धोका वाढतोच आहे. मात्र महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे ज्यामध्ये करोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांच्यावर गेली आहे. मुंबईत तर दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. सोमवारी महाराष्ट्रात करोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला यापैकी ९ रुग्ण मुंबईतले होते. देशात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमागे दर दुसरा मृत्यू महाराष्ट्रात तर तिसरा मृत्यू मुंबईत होतो आहे. ही तीन दिवसांपूर्वीची स्थिती होती. अशात आता करोनाचे रुग्ण वाढून संख्या ३२०० च्या पुढे गेली आहे.