संभाजी निलंगेकरांचे राजकीय वजन वाढले; ‘रेल्वे कोच’ कारखान्याच्या माध्यमातून ३० हजार जणांना रोजगार रेल्वे कोच तयार करण्याचा कारखाना लातूरमध्ये सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केल्याने मराठवाडय़ातील मागास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये विकासाची गंगा वाहू लागेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने स्थलांतर थांबेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रेल्वे कारखान्याच्या माध्यमातून भाजपला राजकीय लाभही होणार आहे. लातूर हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, दिवंगत विलासराव देशमुख व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे दिग्गज नेते लातुरातीलच. सुमारे ४० वष्रे या जिल्हय़ावर काँग्रेसची पकड होती. २०१४ च्या निवडणुकीत अडीच लाखाने लोकसभेची जागा भाजपनेजिंकली होती. त्यानंतर जिल्ह्य़ात विधानसभा व त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाची सरशी झाली व जनतेने काँग्रेसला मनातून अव्हेरले. कोणाच्या स्वप्नातही आले नसेल इतकी मोठी भेट भाजपाच्या केंद्रातील सरकारने लातूरकरांना दिली. शिवराज पाटील चाकूरकरांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शिक्षण केंद्र चाकुरात सुरू केल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले होते. भाजपा सरकार लातूरसाठी काही वेगळे करेल याबद्दल फारसा आशावाद नव्हता. निवडणुकीत घोषणा केल्या जातात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही याचा अनुभव वारंवार पाठीशी असल्यामुळे भाजपा सरकारही काही वेगळे करेल असे वाटले नव्हते मात्र ‘आंधळा मागतो अन् देव देतो दोन’ याप्रमाणे भाजपा सरकारने २५ हजार कोटी रुपयांचा रेल्वे कोच तयार करण्याचा कारखाना लातुरात सुरू करण्याचा निर्णय घेतला व तोही दोन हजार एकर जमिनीवर उभा राहील. सुमारे ३० हजार लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. परिणामी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे कोच तयार करण्याचा कारखाना लातूर येथे सुरू करण्याची घोषणा केली. या घोषणेचे भाजपाच्या मंडळींनी तर स्वागत केलेच. काँग्रेसचे आ. अमित देशमुख, औशाचे आ. बसवराज पाटील मुरूमकर यासह सगळय़ांनीच या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले. या प्रकल्पामुळे लातूरचे मागासपणाचे बिरुद निघून जाणार आहे. रोजगारासाठी वर्षांनुवष्रे या परिसरातील मंडळींना स्थलांतर करावे लागत होते. ते यामुळे बंद होण्याची स्थिती निर्माण होणार आहे. रेल्वे कोच तयार करण्याचा कारखाना सुरू होण्याबरोबरच छोटे-मोठे या उद्योगाशी आनुषंगिक व्यवसायही या परिसरात उभे राहतील त्यामुळे हजारो तरुणांच्या हाताला काम मिळू शकेल. टेंभी येथील भेलचा कारखाना सुरू करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे. रेल्वे कोच कारखान्याची घोषणा झाल्याने संभाजी पाटील निलंगेकर यांचे मराठवाडय़ातील एक मातब्बर मंत्री असे स्थान पक्के झाले आहे.