स सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेश मुर्तीची शनिवार दि.२२ ऑगस्ट रोजी स्थापना करण्यात येणार आहे. दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश चतुर्थी सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे

कोकणात गणेशोत्सव हा मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे आणि परगावी असणारे चाकरमानी आपापल्या गावी येतात. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी अगोदरच जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

तसेच काही चाकरमान्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर गावाच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी गावी आले नाहीत.

आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला होणार आहे. प्रामुख्याने कोकणात घराघरात गणेशोत्सव श्रद्धेने साजरा होतो. मुंबई व अन्य ठिकाणी असलेले जिल्हावासीय चाकरमानी या निमित्ताने आपापल्या गावी येतात दीड दिवसापासून ११ दिवसांपर्यंत म्हणजे अनंत चतुर्थी पर्यंत हा सण साजरा होतो. काही नवसाचे गणपती अनंत चतुर्थी नंतरही थांबतात. हा सण सुरळीत व शांततेत व्हावा यासाठी पोलीस आणि जिहा प्रशासन खबरदारी घेत आहे. यानिमित्त वाढलेली वाहतूक सुरळीत राहावी या साठी प्रशासनाचा कटाक्ष आहे.

जिल्ह्यातील बाजारपेठामध्येही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे.

गणपतीच्या शाळा गजबजल्या असून मूर्तिकार मुर्तीवर अखेरचा हात फिरविण्याच्या गडबडीत आहेत. काही शाळांमधून बाप्पा घरी पोहोचले आहेत.

सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव होत आहे. यामध्ये दोडामार्ग ५, बांदा १, सावंतवाडी ६, वेंगुर्ला ३, कुडाळ ४, मालवण २, आचरा १, देवगड १, कणकवली ५ आणि वैभववाडी ४ असे ३२ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत आहेत.

घरगुती गणेशोत्सवामध्ये दोडामार्ग मध्ये ४८३४, बांदा २६५०, सावंतवाडी ९९८५, वेंगुर्ला ४९५२, निवती ३२७०, कुडाळ ८६०३, सिंधुदुर्गनगरी २४२९, मालवण ४५०५, आचरा २४२५, देवगड ६७१०, विजयदुर्ग २६५०, कणकवली ९७१० तर वैभववाडी ५३४५ अशी ६८ हजार ६८ कुटुंबे गणरायाचे पूजन करीत आहेत त्यामुळे जिल्ह्यात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. तर गतवर्षीच्या प्रमाणात २४५ घरगुती गणपती कमी झाले असून या गणपतींचे पूजन मुंबई पुणे येथे अडकलेल्या चाकरमान्यांच्या राहत्या घरी होणार आहे.

जिल्ह्यात चाकरमान्यांची कमतरता नाही

गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. दरवेळी गणेशोत्सवाच्या आदी एक दोन दिवस त्यांचे आगमन होत असे. मात्र यावर्षी उद्भवलेल्या करोना महामारीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानी लॉकडाऊ न कालावधीत जिल्ह्यात दाखल झाले आहेत तसेच काही चाकरमानी गेल्या १५ दिवसात दाखल झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा एक दोन दिवस आदी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्येक घरी आणि वाडी वस्तीत यापूर्वीच चाकरमानी दाखल असल्याने जिल्ह्यात चाकरमान्यांची कमतरता दिसून येत नाही.