नागपूरच्या एकाच कुटुंबातील चार ठार

अकोला : वाशीम जिल्ह्यतील मंगरुळपीर तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर तऱ्हाळा गावाजवळ बुधवारी पहाटे ५.१५ वाजताच्या सुमारास नागपूर येथून बुलढाणा जिल्ह्यतील सैलानी यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीला भीषण अपघात होऊन त्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक उपचारादरम्यान दगावला. तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथून झायलो गाडीने (क्र.एमएच ४९ बी ७०१९) एकाच कुटुंबातील ११ जण सैलानी यात्रेसाठी जात होते. मार्गात अज्ञात वाहन जवळून गेल्याने झायोलो चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी उलटली. या अपघातामध्ये मुस्कान शे. सलीम (२३), वहिदा शे. गुलामनबी (४०), सलीम खान अब्दुल कासम (५०) रा. बडा ताज नागपूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, वहिदा खातुन ऊर्फ राणी महफूज खान (४०) यांचा उपचारादरम्यान अकोल्यात मृत्यू झाला. या अपघातात अलिया शे. इम्रान (सहा), शे. हरीश शे. इम्रान (सात), शे. वाजीया परदरीन शे. इमान (२६), अलबीरा शे. इमरान (चार) हे जखमी झाले असून, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. अकोला व वाशीम येथे उपचार करून त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. चालक शे. इम्रान किरकोळ जखमी झाला असून, या भीषण अपघाताचा पुढील तपास मंगरुळपीर पोलीस करीत आहेत.