चाळीसगाव तालुक्यातील पिपळवाड निकुंभ येथे विहिरीवरील मोटारीचे काम सुरू असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे . यामध्ये एकाच कुटुंबातील दोन जणांचा समावेश असून विहिरीचे काम करणाऱ्या दोघांचा ही मृत्यू झाला आहे . आज दुपारी तीनच्या सुमारास मन्याड नदी मध्ये असलेल्या विहिरीतील मोटार काढण्याचे काम सुरू होते . त्यावेळी विजय चिंधा नागरे यांच्यासह भानुदास कत्थु भिल व धुडकु कारभारी सोनवणे हे काम करीत असताना अचानक विहिरीत पडले . त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या अंकुश बंडू नागरे यांचाही विहरीत तोल गेला. या घटनेत चौघांचाही मृत्यू झाला. मात्र, पाच ते सहा फूट पाणी असलेल्या विहिरीत पडून मृत्यू कसा झाला हे स्पष्ट झालेले नाही . दरम्यान, या घटनेनंतर तहसीलदार आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. यावेळी गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . विहिरीतील मोटार काढताना शॉक लागल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये मध्ये सुरू होती.