आगाऊ रक्कम भरली तरी जोडणी नाही; कार्यालयात वारंवार हेलपाटे कासा : एकीकडे वीज देयक भरा म्हणून महावितरण आवाहन करत आहे. तर दुसरीकडे वीज जोडणीकडे आलेल्या अर्जांकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. विक्रमगड तालुक्यातील ४०० नागरिकांनी वीज जोडणी मिळावी म्हणून अर्ज केले सोबत आगाऊ रक्कमही भरली आहे . परंतु अनेक महिने उलटून गेल्यानंतरही सदर वीज जोडणी दिलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. विक्रमगड तालुक्यात ग्राहकांकडून वीज देयकबाकी वसूल करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी देयक लवकरात लवकर भरा, असे आवाहन महावितरणकांकडून नागरिकांना करण्यात येत आहे. परंतु ज्यांना विजेची गरज आहे त्यांना वीज जोडणी देण्याचे कामाबाबत कंपनीला गांभीर्य नाही. वीज नसल्याने मोबाइल चार्ज करण्यासाठी सुद्धा शेजारच्यांची मदत घ्यावी लागते. वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर अनेकांनी टीव्ही, फ्रीज, फॅन अशा विजेवर चालणाऱ्या वस्तू घेऊन ठेवल्या आहेत. परंतु विजेचाच पत्ता नसल्याने ही उपकरणे धूळ खात पडून आहेत. एकीकडे विजेवर चालणारी वाहने बाजारात आली आहेत मात्र विक्रमगडसारख्या आदिवासी ग्रामीण भागात वीज मीटर मिळवण्यासाठी नागरिकांना महावितरणचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अजूनही दररोज महावितरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज येत आहेत, परंतु ते निकाली लावण्याकडे दिरंगाई होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांच्या मागणीनुसार वीज जोडण्या सुरू आहेत, परंतु मिटरचा तुटवडा असल्याने वीज जोडणी देताना अडचणी येत आहेत. तरी मार्च अखेरपर्यंत सर्व अर्जदारांना वीज जोडणी देण्यात येईल. - महेश नागो, कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय विक्रमगड आम्ही वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. तीन महिने झाले तरी अजून वीज मीटर मिळालेले नाही. आम्ही बऱ्याचदा महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या मारल्या, परंतु लवकरच मीटर येतील, असे नेहमी सांगितले जात आहे. -भूषण महाले, नागरिक