नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने करोनाशी लढण्यासाठी नामच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये पाठवणार आहोत असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

काय म्हटलं आहे नाना पाटेकर यांनी?

“नमस्कार मी नाना पाटेकर, या क्षणाला आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंथ विसरुन सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या आपत्तीशी सरकार एकटं नाही लढू शकणार. आपण आपआपला वाटा उचलायला हवा. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, पीएम आणि सीएम फंडासाठी प्रत्येकी ५० लाख पाठवणार आहोत. तुम्हीही तुमचा वाटा उचलाल याची खात्री आहे. कृपया घराबाहेर पडू नका. घराबाहेर न पडणं ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे या क्षणाला. एवढी मेहरबानी करा. धन्यवाद! ”

असं निवदेन करत नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनतर्फे प्रत्येकी ५०-५० लाखांची मदत सीएम आणि पीएम फंडासाठी केली आहे. त्यांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या २२० झाली आहे. तर देशातले रुग्ण १ हजारांवर गेले आहेत. संपूर्ण देश लॉकडाउन आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वारंवार घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. देशभरात करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. संचारबंदी आणि लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.