राज्यात औरंगाबाद व अन्य महानगरांमध्ये कचराकोंडी होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याच्या घटना पाहावयास मिळत असताना इकडे सोलापूर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे पाचशे टन कचऱ्यातून निम्म्या प्रमाणात म्हणजे सुमारे २५० टन कंपोस्ट खताच्या रूपाने ‘सोने’ निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न होत आहे. या माध्यमातून घनकचरा हाताळणी व व्यवस्थापनात सोलापूरचे पडणारे पाऊल आश्वासक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्र शासनाने २००० साली घनकचरा हाताळणी व व्यवस्थापनासाठी नियम तयार केले होते. त्यात अलीकडे काही सुधारणाही झाल्या. नवीन नियमानुसार जो घनकचरा तयार केला जातो, तो स्थानिक नागरिकांनी एकत्र न करता ओला व सुका असे विलगीकरण करून द्यावा. अन्यथा तो कचरा स्वीकारण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची राहणार नाही. त्यानुसार शास्त्रीय पध्दतीने वेगवेगळ्या पध्दतीचा कचरा गोळा केल्यानंतर त्या अनुषंगाने पूरक अशा पध्दतीची कचरा वाहतूक यंत्रणाही करणे बंधनकारक आहे. सोलापूर महापालिकेने स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत त्या दिशेने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. स्मार्ट सिटीच्या निश्चित ठरलेल्या परिसरात हे पाऊल पडते आहे. यात घरोघरी जाऊन ओला व सुका असा स्वतंत्र पध्दतीने गोळा केलेला कचरा घंटागाडय़ांमध्ये भरला जातो. त्यात ४० टक्के ओला व ६० टक्के सुका कचरा भरण्यासाठी दोन स्वतंत्र कप्पे आहेत. सध्या स्मार्ट सिटी परिसरात ३५ तर उर्वरित भागात ७० घंटागाडय़ा उपलब्ध आहेत. आणखी १२० घंटागाडय़ांची गरज असल्यामुळे त्यासाठी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत निधी उपलब्ध होत आहे. या घंटागाडय़ांची कार्यमग्नता राहण्यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. याशिवाय येत्या दीड महिन्यात तंज्ञज्ञांकडून एक अॅप विकसित करून मिळणार आहे. घरोघरी उचलला गेलेला कचरा सध्या थेट मुख्य कचरा डेपोत नेला जातो. परंतु घनकचरा हाताळणी व व्यवस्थापनांतर्गत सुधारणा करताना यापुढे गोळा झालेला कचरा थेट मुख्य कचरा डेपोत जमा न करता शहरातील विविध चार ठिकाणी कार्यान्वित झालेल्या कचरा ट्रान्स्फर स्टेशनमध्ये आणून जमा केला जाणार आहे. त्यासाठी हे कचरा ट्रान्स्फर स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन महिन्यात प्रत्यक्षात करचा ट्रान्स्फर स्टेशन कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. एका केंद्रात ओला व सुक्या कचऱ्यासाठी प्रत्येकी २० टन क्षमतेचे दोन बंदिस्त हौद उभारण्यात येतील. त्यात ८० टक्के कचरा भरला तर लगेचच त्याची माहिती यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाला मिळेल व तातडीने तेथील कचरा उचलून तुळजापूर रस्त्यावरील मुख्य कचरा डेपोत आणून टाकला जाईल. कचरा ट्रान्स्फर सेंटर पूर्ण बंदिस्त असल्याने त्यातील किलोभरही कचरा बाहेर पडणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. सध्या अशा पध्दतीचा प्रकल्प इंदुरात कार्यरत आहे. २५० टन कंपोस्ट खत मुख्य कचरा डेपोवर सध्या खासगी तत्त्वावर कचऱ्यापासून दररोज दोन मेगावॉट ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प कार्यरत आहे. याशिवाय कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मितीही केली जाते. सध्या तेथे सुमारे २५० टन कंपोस्ट खत तयार होत असल्याचे महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक डेंगळे-पाटील यांनी सांगितले.