रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पासाठी गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नाणारमध्ये तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. खरंतर नाणारमध्ये सर्व जमिनी या स्थानिक शेतक-यांच्या आहेत. मात्र फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, नाणारमध्ये जमीन खरेदी करणा-यांपैकी ८६ पैकी ३८ जण व्यापारी असून यामध्ये मोदी, जैन, शाह, झुनझुनवाला यांची नावे आहेत. २ मे २०१७ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान म्हणजे फक्त आठ महिन्यांत व्यापा-यांनी जवळपास ५५९ एकर जमीन खरेदी केली आहे. यावरुन राजकारणी आणि व्यापा-यांची साटंलोटं असल्याचं सिद्ध होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

‘एकीकडे स्थानिक विरोध करत असताना जमीन खरेदी करणा-या व्यापा-यांनी जे आता मालक आहेत त्यांनी आधीच एनओसी देऊन टाकली आहे. व्यापा-यांना या प्रकल्पाची माहिती कशी काय मिळाली ? इथल्या जमीन खरेदी करण्यात त्यांना अचानक इतका रस का आला ? याचा थेट अर्थ आहे की, काही राजकारण्यांनी व्यापा-यांना नाणारमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे व्यापा-यांना तब्बल २०० टक्के नफा होणार आहे आणि तोदेखील सफेद पैशांमध्ये’, असं संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी म्हटलं आहे.

धक्कादायक म्हणजे गुंतवणूक करणा-यांच्या नाव अद्यापही लँड टायटलवर नाहीये. त्यांनी फक्त स्थानिक प्रशासनाला जमीन अधिग्रहण करण्यासाठी आपण तयार असल्याचं कळवलं आहे. याचा अर्थ त्यांनी कोणतीही कागदपत्रं जमा न करता शेतक-यांकडून जमिनी खरेदी केल्या आहेत. या गुंतवणुकीतून आपल्याला करोडोंचा फायदा होणार असल्याची कल्पना व्यापा-यांना आधीच होती.

जवळपास ८६ शेतक-यामनी आपली ५५९.७७ एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. ही जमीन मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान खरेदी करण्यात आली आहे. १८ मे २०१७ रोजी राजापूरमध्ये जमीन अधिग्रहणाचं परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर या जमिनींची खरेदी-विक्री झाली. ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांच्यात मोदी, जैन, मुदीराज, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, कटारिया, केडिया, चंदर, थाववरी, रथी आणि झुनझुनवाला यांचा समावेश आहे. यांच्यात काही जाधव, कारंजे, देवळेकर, जोशी असे महाराष्ट्रीयनदेखील आहेत.

वालम यांच्या म्हणण्यानुसार व्यापा-यांचा शेतजमिनीशी काही संबंध नाही. त्यांनी ज्या जमिनी खरेदी केल्या आहेत त्या नापीक असून तिथे कोणतीही शेती करणं अशक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी जमीन खरेदी करणं थोडं संशयास्पद आहे. याची चौकशी झाली पाहिजे.