मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात असतानाच गणरायाच्या भाविकांच्या मृत्यूचे त्याला गालबोट लागले. राज्याच्या विविध भागात घडलेल्या घटनांमध्ये तीन चिमुकल्यांचा, तर अन्य ११ जणांचा विसर्जनादरम्यान नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथे गणेश विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. शिवनाई तलावात गणपती विसर्जन करताना आदिल कीर्तीशाई(१२), सागर तेलभाते (१३) आणि राजेश गायकवाड (१२) अशा तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले अर्जुन पोपळघट आणि योगेश कांबळे यांना वाचवण्यात यश आले आहे. गावातील गणेश मूर्तीचे नेहमी ज्या ठिकाणी विसर्जन केले जाते. तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिकृतरित्या गणेश विसर्जनासाठी या तलावात परवानगी नसली तरी, घरगुती गणेशाचे विसर्जन येथे केले जाते. त्यामुळे हे पाच चिमुकले गणेशाचे विसर्जन करण्यासाठी तलावाकडे गेले होते. या तलावात अवैधरित्या उत्खनन झालेले असल्याने मोठमोठे खड्डे झाले आहेत. कदाचित त्याचा अंदाज न आल्याने या मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसावा. घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी जे नागरिक आले होते, त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यांनी या तलावाकडे धाव घेतली आणि त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढले. तसेच उपचारासाठी बिडकीन शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील तिघांना रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नाशिकमध्ये विसर्जनादरम्यान सेल्फी घेत असताना तोल जाऊन दारणा नदीच्या पात्रात पडल्याने कैलास किशोर सोनार या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. किशोर हा नाशिकमधील चेहडी परिसरात राहात होता. आईवडिलांसोबत तो विसर्जनासाठी आला होता. बीडमधील माजलगाव येथे उमरी नदीपात्रात विसर्जनाच्यावेळी एका १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

जळगावात विसर्जनादरम्यान दोन मृत्यू तर दौलताबाद येथे आकाश साठे या युवकाचा विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड येथील मुळा नदीत दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सोनाजी शेळके या १६ वर्षीय तर रखमाजी वारखड या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तसेच पुणे/हडपसर मधील वडकीनजिक मस्तानी तलावात रोहित जगताप व ओमकार जगताप ही दोन भावंडे बुडाली. यातील एकाला वाचवण्यात यश आले तर दुसरा तलावातील पाण्यात बुडालाा आहे. खेड तालुक्यातील मरकळ येथे इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या आकाश वरपे या १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.