लोकसत्ता खास प्रतिनिधी
औरंगाबाद: शहरातील हर्सूल कारागृह परिसरात २९ जणांना करोनाबाधा झाली असून शनिवारी अचानक ९० रुग्णांची वाढ झाली. एका बाजूला शहरातील दुकाने उघडण्याची प्रक्रिया सुरू असताना झालेली ही रुग्णवाढ चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या विविध रुग्णालयात ६८६ रुग्ण उपचार घेत आहेत. औरंगाबादमध्ये आतापर्यंत १९५४ रुग्ण आढळले असून त्यातील ११५४ रुग्ण स्वगृही परतले आहेत. शहरातील रुग्णांबरोबर गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव देवशी येथेही रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी पुन्हा महिलेचा मृत्यू झाल्याने करोनाबाधित मृत व्यक्तीची संख्या आता ९६ वर गेली आहे.

शहरातील चंपा चौक भागातील ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा पाच जून रोजी दुपारी ३.१५ वा.उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत शासकीय वैद्याकीय महाविद्याालय आणि रुग्णालयात ७५, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण २०, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये यामध्ये २१ महिला आणि ६९ पुरुषांचा समावेश आहे.

शहरातील राधास्वामी कॉलनी,भारतमातानगर, हर्सूल परिसर, शिवशंकर कॉलनी, आकाशवाणी परिसर, न्यायनगर, कैलासनगर, आंबेडकर, बीडबायपासरोड, गादियाविहार शंभूनगर, छावणीमधील तोफखाना, वेदांतनगर, देवडीबाजार, जवाहर कॉलनीमधील बुद्धनगर, अल्तमश कॉलनी, पैठण गेट, गौतमनगर या भागात प्रत्येकी एकाला करोनाची बाधा झाली. एन-११, एन-८, संजयनगर, भीमनगर भावसिंगपुरा नॅशनल कॉलनी आदी ठिकाणी दोन तर रोशनगेट भागात पाच, उस्मानपुरा येथील पीरबाजारमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत. कारागृहात एकाच वेळी २९ जण करोनाबाधित आढळले आहेत.