उस्मानाबाद : उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्य़ांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या १९ वर्षांत उस्मानाबाद जिल्ह्यातील ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१४ सालानंतर शेतकरी आत्महत्येचा आलेख जिल्ह्यात वाढत गेला आहे. दर तीन दिवसांला एक आत्महत्या याप्रमाणे मागील पाच वर्षांत ७३० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. २०१५ साली जिल्ह्यात सर्वाधिक १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर उपाययोजना करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याचेही जाहीर करण्यात आले. ५५० कोटी रुपयांपैकी मोजकाच निधी पोहोचला. तोही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखू शकला नाही. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि लहरी ऋतुचक्रामुळे शेतकऱ्यांच्या वाटय़ाला नराश्य आले. २०१९ मध्ये गेल्या सहा महिन्यांत ६३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. पैकी केवळ १८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय पातळीवर अनुदानास पात्र ठरल्या आहेत. मागील दहा वर्षांत झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा आकडा पाहता, जवळपास ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी आत्महत्या शासन दरबारी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. ९९० पैकी ४९५ शेतकरी शासनाच्या अनुदानास पात्र नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. केवळ ४७७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेती प्रश्नांशी निगडित कारणांमुळे झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पात्र घोषित करण्यात आले आहे. मागील १९ वर्षांतील शेतकरी आत्महत्यांच्या प्राप्त प्रकरणांची संख्या पाहता २०१४ सालानंतर त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. २००१ ते २०१३ या १३ वर्षांत एकूण २३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या नोंदविल्या गेल्या आहेत. पैकी २००७ आणि २००८ या दोन वर्षांत सलग ५२ आणि ५० अशा १०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१४ सालानंतर अचानक या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली. २०१४ मध्ये ७१, २०१५ मध्ये १६४ त्यानंतर दरवर्षी अनुक्रमे १६१, १२६, १४० आणि यंदा जूनअखेर ६३ अशा ७३० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला.