“सुरुवातीच्या काळात या आंदोलनात शेतकरी मोठ्याप्रमाणावर होते, परंतु आता शेतकरी देखील मोठ्याप्रमाणात निघून गेले आहेत. कारण शेतकऱ्यांच्या देखील हे लक्षात आलं आहे की , केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.”

केंद्र सरकराच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास, महिनभरापेक्षाही अधिक दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोनल सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने, केंद्र सरकार व शेतकऱ्यांमधील चर्चांच्या बैठका निष्फळ ठरत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- …आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत- फडणवीस

यावेळी फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं आहे की आता जर आपण दिल्लीचं आंदोलन बघितलं. तर, डाव्या विचारसरणीचे लोकचं त्याचं नेतृत्व करत असल्याचं दिसत आहेत व अन्य काही वेगळी लोकं देखील आहेत. सुरुवातीच्या काळात शेतकरी मोठ्याप्रमाणावर होते, परंतु आता शेतकरी देखील मोठ्याप्रमाणात निघून गेले आहेत. कारण शेतकऱ्यांच्या देखील हे लक्षात आलं आहे की , केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू मला विश्वास आहे, केंद्र सरकार संपूर्ण चर्चा करत आहे. संवादातून प्रश्न सुटतात, त्यामुळे ते सुटतील. जे काही नेते आता बैठका करत आहेत किंवा याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झालाच, तरी फार तो यशस्वी होईल असं मला वाटत नाही.”

… नाहीतर आम्हीच कृषी कायद्यांच्या अमलबंजावणीला स्थगिती देऊ; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला घेतलं फैलावर

दरम्यान, “हे दुसऱ्या सरकारनं सुरू केलं होतं, हे सरकारचं म्हणणं अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही. तुम्ही यातून तोडगा कसा काढत आहात? कृषी कायद्यांची स्तुती करणारी एकही याचिका आमच्याकडे आलेली नाही. शेतकऱ्याच्या विषयाबद्दल न्यायालय तज्ज्ञ नाही. पण, तुम्ही या कायद्यांची अमलबजावणी थांबवणार आहात की, आम्ही पावलं उचलायची? परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोक मरत आहेत. थंडीत बसले आहेत. तिथे अन्नपाणी पाण्याचं काय आहे? कोण व्यवस्था ठेवत आहे?,” असे प्रश्न उपस्थित करत आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारल्याचं दिसून आलं आहे.