इचलकरंजी येथे एका मध्यमवयीन गृहस्थाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरूणकुमार उमाशंकर उपाध्याय असे या गृहस्थाचे नाव आहे. अरूणकुमार मूळचा भीमपूर, उत्तरप्रदेशचा राहणारा होता. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मागील वर्षी झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत अरूणकुमार उपाध्याय यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या दिवसापासूनच ते नैराश्यग्रस्त झाले होते. २० दिवसांपूर्वी इचलकरंजीच्या आर. के. नगर येथील नातेवाईक त्यांना घेऊन आपल्या घरी आला होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते झोपण्यासाठी गेले. सकाळी त्यांना उठवण्यासाठी नातेवाईक गेले असता उपाध्याय यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.