कार्बाईड पावडरचा वापर करून पिकविलेले १ हजार ३१८ किलो आंबे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी बुलडोझर फिरवून नष्ट केले. पावडरचा वापर करून पिकविल्या जाणाऱ्या आंब्याचा शोध घेऊन ते नष्ट करण्याची या हंगामातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
औरंगपुरा, उस्मानपुरा भागात शुक्रवारी या पथकाने फळविक्रेत्यांकडे तपासणी करून फळांचे नमुने घेतले. त्यानंतर शनिवारी शहरातील गुलमंडी, उस्मानपुरा, जाधववाडी परिसरात विविध फळविक्रेत्यांकडे जाऊन फळांची तपासणी केली व नमुने घेतले. जाधववाडी येथील शब्बीर खान याच्या मे. मदिना फ्रूट सप्लाय या पेढीत कार्बाईडची पावडर वापरून आंबा पिकवला जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या पेढीतून ३९ हजार ६०० रुपये किंमतीचे १ हजार ३१८ किलो आंबे जप्त करून नारेगावच्या कचरा डेपोत बुलडोझरने खड्डा घेऊन नष्ट करण्यात आले.
सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके व सहायक आयुक्त एम. डी. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधवर, ए. जी. गायकवाड, श्रीमती रोडे, ए. ए. पवार व सी. व्ही. कासार यांच्या पथकाने ही कारवाई केली.