सध्याच्या परिस्थितीत समन्वय, संतुलन व संवेदना ही आचारसंहिता स्वीकारल्यास करोनाचा सहज मुकाबला करता येईल, असा हितोपदेश भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (नवी दिल्ली)चे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी केला आहे.

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठातर्फे  आयोजित वेबिनार अंतर्गत खासदार सहस्त्रबुध्दे यांनी विद्यार्थांशी संवाद साधला. ‘कोविड‑19 चे संकट व विद्यार्थांची भूमिका’ या विषयावर त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून व्यक्ती, समाज आणि संस्थांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करावा लागेल. असे त्यांनी सांगितले.

इतरांचीही काळजी आम्हाला घ्यावी लागेल. महात्मा गांधी यांना प्रिय असलेल्या वैष्णव जन तो… या भजनातून हाच संदेश मिळतो. करोनामूळे भौतिक अंतर निर्माण होत असेलही, परंतू मन, मेंदू व वैचारिकता यात खुलेपणा हवा. आचारण संवेदनशील हवं, सर्व विचारधारांचे स्वागत आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग असला पाहिजे, असंही ते म्हणाले.

करोनामूळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा संदर्भ देत खा. सहस्त्रबुध्दे म्हणाले, कमी उत्पन्न, कमी शिष्यवृत्ती आणि कमी खर्चाची कामे अशा स्थितीत आम्हाला अध्ययन व अध्यापनाचे कार्य करायचे आहे. विद्यापिठाच्या फेसबुक पेजच्या माध्यामातून खा. डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी संवाद साधला. विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी त्यांचे स्वागत केले.