येवला-मनमाड मार्गावरील अनकाई बारीजवळ दोन गाडयांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. इर्टिगा आणि आयशर कारची टक्कर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुत्रांच्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेले कुटुंब हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळाच्या परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरु केले. मात्र, अपघात इतका भीषण होता की मदत मिळण्यापूर्वीच कारमधील लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यामुळे येवला-मनमाड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातातील मृतदेह हे येवला येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. या मृतांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.