कल्याण-अहमदनगर मार्गावर असलेल्या जुन्नर तालुक्यातल्या पिपरी पेंढार गावाजवळ इनोव्हा आणि अल्टो कारची धडक झाली आहे. या अपघातात अल्टो कारमधले सागर कटारिया आणि श्वेता कटारिया हे दोघे पती पत्नी जागीच ठार झाले आहेत. कटारिया यांची १२ वर्षांची मुलगीही आणि ७ वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावले आहेत. कटारिया हे मूळचे अहमदनगरचे असून ते ओतूरमध्ये लग्नासाठी आले होते. ओतूरहून अहमदनगरला जात असताना हा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. तर इनोव्हा कारमधले सगळे प्रवासी कल्याणचे असून ते शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. इनोव्हाकारमध्ये एकूण पाच प्रवासी होते त्यापैकी तीन जण जखमी झाले आहेत. तर कटारिया यांची दोन मुले जखमी झाली आहेत. कटारिया दांपत्याच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. या दोन्ही मुलांवर आणि इतर तीन जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.