पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा अंत झाला आहे. तर या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. काशीळ या गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात सौदागर कुटुंबातले साहजण या अपघातात ठार झाले. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काशीळ गावाजवळ ही घटना घडली.

सौदागर कुटुंबीय पुणे-बंगळुरु महामार्गावरुन जात असताना त्यांच्या कारचालकाचा कारवरचा ताबा सुटला आणि त्याचमुळे हा अपघात झाला. या अपघातात गाडी झाडाला इतक्या जोरात धडकली की गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये सौदागर कुटुंबातले सहाजण ठार झाले. गाडीचा चालक आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, एक लहान मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. सौदागर कुटुंबीय हे कर्नाटकमधील धारवाडचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.