राज्यामध्ये आज (रविवार) रात्री आठ वाजल्यापासून जमावबंदीचा आदेश लागू झालेले आहेत. दरम्यान, बोईसर आलेवाडी नांदगाव जवळील सांज रिसॉर्ट येथे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी छापा टाकून ४७ जणांवर कारवाई केल्याचे समोर आले आहे. पालघर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सद्यस्थितीत तालुक्यात सुमारे ५०० अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. होळी सणाच्या निमित्ताने शहरी भागातून अनेक एक नागरिक आपल्या मूळ गावी परतले असून आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नियमांचे उल्लंघन करणार्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी सक्रिय राहणार आहे. पालघर जिल्ह्यात ५ एप्रिल पासून दुकाने, बाजारपेठ, रिक्षा वाहतूक यांच्यावर निर्बंध लागले आहेत. तर, शाळा महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत.