सात कोटी ९० लाखांचा माल जप्त; करोना साथ नियंत्रणातील प्रशासनाच्या व्यग्रतेचा माफियांकडून गैरफायदा वसई : वसई पूर्वेतील खानिवडे व खार्डी येथील बंदरातील काही जण वैतरणा व तानसा नदी पात्रात बेकायदा वाळू (रेती)उपसा करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर पालघर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी उपसा पंप, बोटी, जेसीबी, उपसा केलेली वाळू असा एकूण सात कोटी ९० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. करोनाकाळात अनेक शासकीय यंत्रणा करोना साथरोगाला रोखण्याच्या कामात व्यस्त आहेत. याचाच गैरफायदा घेऊन तानसा व वैतरणा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता.यामुळे पर्यावरणालाही याचा धोका निर्माण झाला होता. सुरू असलेल्या गैरप्रकारची माहिती पालघर पोलिसांना मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यास सुरवात केली होती. शनिवारी संध्याकाळ पासून खानिवडे व खार्डी बंदरात पोलिसांनी कारवाईला सुरवात केली होती ती कारवाई रविवार दुपार पर्यँत चालू होती. या कारवाई दरम्यान खार्डी व खानिवडे या दोन्ही ठिकाणाहून उपसा करण्यात आलेली १ हजार ६५० ब्रास वाळू व २३० बोटी, १५० वाळू उपसा करण्यास वापरण्यात येणारे सक्शन पंप, १ जेसीबी असा एकूण ७ कोटी ९० लाख ३५० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या दोन्ही बंदरात कारवाई सुरू होताच काही बोट चालकांनी आपल्या बोटी सफाळे येथील टेम्भीखोडावे बंदरात आणल्या होत्या. टेम्भीखोडावे येथील बंदरात बोटी येताच पालघर तहसिलदारांनी ७ बोटी पेटवून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी अज्ञातांच्या आरोपींच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात कलम ३७९, ३४ प्रमाणे २ गुन्हे दाखल केले आहेत. चौकशीचे आदेश विरार पूर्वेतील खार्डी व खानिवडे येथील तानसा व वैतरणा नदी पात्रात बेकायदा होत असलेल्या वाळू उपशावर विरार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलिस निरीक्षक कल्याणराव म्हस्के यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. तर विरार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मांडवी दूरक्षेत्रात सुरू असलेल्या वाळू उपसा या गैरप्रकाराकडे लक्ष न देता कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित विभागात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक व इतर १२ पोलीस कर्मचारी यांची अप्पर पोलीस अधीक्षक कार्यलय व उपमुख्यालय वसई येथे बदल्या करण्यात आल्या आहेत.