पीकविमा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या तलवाडा शाखेसमोर लागलेली रांग तोडल्याच्या कारणावरून तरुण शेतकऱ्याला दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराचे चित्रण शुक्रवारी सार्वजनिक माध्यमासह दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारीत झाले. त्यानंतर या प्रकरणाचे विधिमंडळातही पडसाद उमटले. मनोहर गांधले या शेतकऱ्याला झालेल्या मारहाणप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन अहवाल मागवला. या दोन्ही पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात या वर्षी मोठय़ा प्रमाणात पीकविमा मंजूर झाला. खरीप हंगामात पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. या पाश्र्वभूमीवर जिल्हा बँकेत पीकविमा भरण्यास शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. प्रशासनाने ३१ जुलअखेर पीकविमा भरण्याचे आवाहन केले. दुष्काळी स्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या हप्त्यात वाढ झाली, तरी विमा भरण्यास मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे जिल्हा बँकेच्या शाखेत गुरुवारी मोठी रांग लागली होती. यात मनोहर गांधले या शेतकऱ्याने रांग मोडली, म्हणून दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली. मारहाणीचे मोबाईल चित्रीकरण केले गेले. हे चित्रीकरण सुरुवातीला व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत झाले. वृत्तवाहिनी प्रतिनिधींनी हे चित्रीकरण व वृत्त गुरुवारी प्रसारीत केले. यानंतर या घटनेचे विधिमंडळातही पडसाद उमटले. दरम्यान, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी या घटनेचा अहवाल मागवला. त्यामुळे यातील दोन्ही पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.