कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस मोजण्यासाठी व कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी कोयना,नवजा, महाबळेश्वर व किल्ले प्रतापगड येथे रेन गेज ठाणे उभारण्यात येणार आहे. मागील वर्षी कोयना व कृष्णा खोऱ्यात पडलेल्या पावसाचे अचूक पर्जन्यमान न होता त्यात चुका झाल्या. त्यामुळे महापुरासारख्या संकटाचा अंदाज आला नाही, असा आरोप जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केला होता. त्यातच शासनाने नियुक्त केलेल्या वडनेरे समितीने कोयना प्रकल्पात पर्जन्यमापन करणारी यंत्रणा सदोष असल्याचा ठपका ठेवला आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने कोयना व कृष्णा खोऱ्यातील धरणे भरून वाहिल्याने कृष्णा नदीला पुर आला. यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा येथे आलेल्या महापुराचाअनुभव नजरेसमोर ठेवून कोयना धरणाचे पूरनियंत्रण उत्कृष्ट होण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेऊन आपत्ती व्यवस्थापनात बदल केला आहे. मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस मोजण्यासाठी रेन गेज ठाणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोयना, नवजा, महाबळेश्वर,काठी, वलवण, कारगाव, बामणोली, प्रतापगड ही आठ पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस मोजण्यासाठी २०१४ पासून सॅटेलाइट यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बऱ्याच वेळा ही यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने पर्जन्यमान मोजताना मोठी अडचण निर्माण होते. कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस पडतो.याच पावसाचे पाणी कृष्णा खोऱ्यातील धरणात जाते. या ठिकाणी पडणाऱ्या पावसाची माहिती अविरतपणे मिळणे गरजेचे असल्याने या तीन ठिकाणी पडणारा पाऊस मोजण्यासाठी रेन गेज स्टेशन बसवावी, हंगामी स्वरूपात पर्जन्यमापकाची नेमणूक करावी, जल विज्ञान केंद्राने ही यंत्रणा उभारली आहे त्या जलविज्ञान प्रकल्प अधिकाऱ्याची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करावी असा आदेशही यावेळी देण्यात आला आहे.