नेवासे येथील वकील रियाज जमशेद पठाण (वय ४९) यांची हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली असून, त्यामागील षडयंत्राचा शोध घेण्यास पोलिसांनी प्रारंभ केला आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून, दोघांना अटक केली आहे. गुंड अण्णा लष्करे याच्या हत्याप्रकरणाच्या खटल्यात विरोधी साक्ष दिल्याने पठाण यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.हत्येच्या निषेधार्थ सोमवारी व मंगळवारी नेवासा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पठाण यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभर गावात तणाव होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार घडला नाही. नेवासे वकील संघटनेने गेले दोन दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवले. तसेच घटनेचा निषेध केला. पठाण यांच्या हत्याप्रकरणी त्यांचा मावस भाऊ आसिफ इलायतखान पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोळय़ा झाडणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मोहन सुरेश लष्करे, रामेश्वर भगवान गाडे, चौरंगी गोरक्षनाथ लष्करे, पवन नरुला, सादिक बशीर शेख, सचिन चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सचिन चव्हाण याला अटक केली आहे. आरोपीने खुनासाठी वापरलेले देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर अण्णा लष्करे याने मृत्यूपूर्वी आरोपीला दिले होते, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रीकरण झाले आहे. या चित्रफितीत हा महाविद्यालयीन विद्यार्थी पठाण यांच्यावर गोळय़ा झाडताना दिसतो. ही चित्रफीत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.पठाण यांचा खून हा तात्कालिक कारणाने रागाच्या भरात केल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. ‘मला पठाण यांनी कट मारला, नंतर शिवीगाळ करून तोंडात मारली. त्याचा बदला घेण्यासाठी मी खून केला,’ असे तो सांगतो. पण, मृत अण्णा लष्करे व तुरुंगात असलेला गुंड राजू जहागीरदार यांच्यातील टोळीयुद्धातून हा खून झाला असून, त्याचा सूत्रधार शोधण्याचे काम सुरू आहे. दोन टोळय़ांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सुडातून हत्यासत्र सुरू असून, आतापर्यंत तिघांचे बळी गेले आहेत. हे हत्यासत्र अद्यापही पोलिसांना थांबवता आले नाही.